नवी दिल्ली : देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली. २०१३ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने(एनसीआरबी) ‘क्राईम इन इंडिया २०१३’ या शीषर्काखाली गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.गेल्यावर्षी आत्महत्येच्या घटनांची संख्या १,३४,७९९ नोंदण्यात आली असून, दशकापूर्वी म्हणजे २००३ मध्ये ही संख्या १,१०,८५१ एवढी होती. मधल्या काळाच्या तुलनेत २०११ नंतर आत्महत्यांचा दर कमी झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला. त्याचे कारण या दशकाच्या काळात लोकसंख्येत १५ टक्के वाढ झाली असताना आत्महत्यांचा दर ५.७ टक्क्यांनी वाढला आहे.(आत्महत्येचा दर २००३ मध्ये १०.४ टक्के होता तो २०१३ मध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढला.) गेल्या दशकात आत्महत्येच्या दरात घट आणि वाढ अशी संमिश्र नोंद झाली. गेल्यावर्षी १६,६२२ आत्महत्यांची नोंद झालेले महाराष्ट्र देशात अग्रक्रमावर आहे. त्यापाठोपाठ १६,६०१ आत्महत्या झालेल्या तामिळनाडूचा नंबर लागतो. या दोन राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण १२.३ टक्के आहे. महाराष्ट्र,तामिळनाडूपाठोपाठ आंध्र प्रदेश, प.बंगाल, कर्नाटक यांचे स्थान आहे. या पहिल्या पाच क्रमांकाची राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण ५३.५ टक्के आहे. अन्य ४६.५ टक्के आत्महत्या उर्वरित २३ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. गेल्यावर्षी चेन्नईत सर्वाधिक २४५० आत्महत्या झाल्या असून, १३२२ आत्महत्यांची नोंद झालेल्या मुंबईचा चौथा क्रमांक लागतो. देशातील प्रमुख ५३ शहरांच्या तुलनेत चार महानगरांमधील आत्महत्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे, हे विशेष. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशात दरवर्षी लाखावर आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक
By admin | Updated: July 4, 2014 09:31 IST