कोकीळ गुरूजी जलतरण तलाव घेतला ताब्यात
By Admin | Updated: November 22, 2015 00:39 IST2015-11-22T00:39:45+5:302015-11-22T00:39:45+5:30

कोकीळ गुरूजी जलतरण तलाव घेतला ताब्यात
>जळगाव : मनपाचा कोकीळ गुरूजी जलतरण तलाव चालविण्यास मक्तेदाराने नकार दिल्यामुळे शनिवारी महापालिका प्रशासनाने तलावाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली आहे. प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर याठिकाणी बाळकृष्ण काशिनाथ महाजन, अरविंद रतीलाल सपकाळे, सूर्यभान रायचंदे, महेश रायचंदे व महिला प्रशिक्षक मृणाल मधुकर कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलतरण तलाव चालविण्यासाठी मनपा प्रशासनाने मक्तेदाराला ठेका दिला होता. मात्र, जलतरण तलाव चालविणे अवघड असल्याचे सांगत ठेकेदाराने जलतरण तलाव चालविण्यास नकार असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने शनिवारी जलतरण तलावाची पाहणी केली. तेथे नादुरुस्त असलेले साहित्य व वस्तुस्थितीचा पंचनामा केला. त्यानंतर जलतरण तलावाचा ताबा घेतला आहे. दुरुस्ती करून फी वाढ करणार सद्य:स्थितीत जलतरण तलावाची प्रचंड दैना झाली आहे. आतील फरशा तुटल्या आहेत. शॉवर व जलशुद्धीकरणासाठी असलेल्या यंत्रणेतही बिघाड झाला आहे. ही परिस्थिती पंचनाम्यातून जाणून घेतल्यानंतर आता जलतरण तलावाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर सद्य:स्थितीत असणार्या फी पेक्षा दुपटीने फी घेण्याचा मनपा प्रशासन विचारधीन आहे. अजीवन सदस्यही रद्द करण्याचा प्रशासन विचारात आहे. ठेकेदारावर कारवाईसाठी महासभेत प्रस्ताव जलतरण तलाव चालविण्यासाठी ठेकेदाराने अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे त्याच्या विरूद्ध कार्यवाही करण्यासाठी महासभेत प्रशासनातर्फे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्याच वेळी जलतरण तलावाची फी व इतर धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.