गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खूश आहेत. या विजयानंतर, पत्रकारांसोबत बोलताना केजरीवाल म्हणाले, मी गोपाल इटालिया आणि संजीव अरोरा आणि तेथील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो.
केजरीवाल म्हणाले, आज या दोन्ही जागांवर आम्ही २०२२ च्या निवडणुकीत जेवढ्या फरकाने जिंकलो होतो, जवळपास त्याहून दुप्पट फरकाने आता विजयी झालो आहेत. हा विजय 'आप'च्या धोरणांवर आणि कामांवर शिक्कामोर्तब करणार आहे. जर पंजाबमध्ये २०२२ चा विजय वादळ होता, तर २०२७ मध्ये तुफान येईल."केजरीवाल पुढे म्हणाले, "विसावदर विधानसभेच्या जागेच्या निकालावरून, दिसून येते की, जनता भाजपच्या ३० वर्षांच्या कुशासनाला कंटाळली आहे आणि आता त्यातून त्यांना सुटका हवी आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने केलेले काम लोकांना आवडले आहे आणि आता त्यांना गुजरातमध्येही तेच काम हवे आहे.
"गुजरातमध्ये दोन जागांवर निवडणुका झाल्या. भाजप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. पण तरीही एका जागेवर आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला आणि दुसऱ्या जागेवर भाजपने विजय मिळवला. यावरून स्पष्ट होते की, गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. भाजपने आमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा जनतेने आम्हाला पुन्हा जिंकून दिली आहे," असेही केजरीवाल म्हणाले.