काश्मीर कोणाची ‘जहागीर’ नव्हे !
By Admin | Updated: May 29, 2014 03:03 IST2014-05-29T03:03:35+5:302014-05-29T03:03:35+5:30
३७० वरून निर्माण केलेल्या वादंगाला आज बुधवारी अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरुद्ध ओमर अब्दुल्ला असे स्वरूप प्राप्त झाले़

काश्मीर कोणाची ‘जहागीर’ नव्हे !
श्रीनगर/नवी दिल्ली : ‘पीएमओ’चे राज्यमंत्री डॉ़ जितेंद्र सिंह यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणार्या राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० वरून निर्माण केलेल्या वादंगाला आज बुधवारी अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरुद्ध ओमर अब्दुल्ला असे स्वरूप प्राप्त झाले़ जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यास विरोध दर्शवणार्या ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर म्हणजे आपल्या बापजाद्यांची जहागीर वाटते का, असा तिखट सवाल रा.स्व. संघाने केला़ यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही चवताळून उठले़ काश्मीरच्या संविधानसभेच्या संमतीशिवाय भाजपा सरकार कलम ३७० हटवू शकत नाही़ ते अशक्य आहे, असे आव्हानात्मक प्रतिपादन त्यांनी केले. काश्मीरमधून निवडून आलेले पीएमओ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच काश्मीर मुद्यावरील वादंगाला तोंड फोडले होते़ राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या मुद्यावर चर्चा करायला नवे सरकार तयार आहे, असे सिंह यांनी म्हटले होते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून एक तर अनुच्छेद ३७० तरी राहील, नाहीतर काश्मीर तरी भारतात राहील, अशी गर्भित धमकी दिली (पान ३ वर...)