कसाबने बिर्याणी मागितलीच नव्हती

By Admin | Updated: March 21, 2015 23:53 IST2015-03-21T23:53:32+5:302015-03-21T23:53:32+5:30

मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती.

Kasab did not ask for biryani | कसाबने बिर्याणी मागितलीच नव्हती

कसाबने बिर्याणी मागितलीच नव्हती

उज्ज्वल निकम : सहानुभूतीला काटशह दिल्यानेच जनक्षोभाची निर्मिती
जयपूर: मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती. त्याच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी, या हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादावर शुक्रवारी येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी निकम येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान माध्यमांची कसाबच्या हालचालींवर बारीक नजर होती. तो केव्हा हसतो, केव्हा रडतो याचीही नोंद घेतली जात असे. त्याचा एक किस्साही निकम यांनी सांगितला. कसाबने एक दिवस याचाच फायदा घेत सुनावणीच्या वेळी गुडघ्यात मान घालून डोळ्यातील अश्रू पुसले. त्यानंतर माध्यमांनी लगेच कसाब रडल्याची बातमी प्रसिद्ध केली. योगयोग म्हणजे त्या दिवशी राखीपौर्णिमा होती. त्यामुळे कसाबच्या या वृत्ताला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. कसाबला आपल्या बहिणीची आठवण झाली म्हणूनच तो रडला, असा कयास या वृत्तांमध्ये लावण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

कसाबने कधी बिर्याणी मागितली नाही आणि शासनाने कधी पुरविली नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. मूळ पाकिस्तानी असलेल्या कसाबला हल्ला झाल्यानंतर चार वर्षांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकविण्यात आले.

Web Title: Kasab did not ask for biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.