जीतनराम मांझी यांचा शपथविधी
By Admin | Updated: May 21, 2014 02:15 IST2014-05-21T02:15:27+5:302014-05-21T02:15:27+5:30
जीतनराम मांझी यांनी मंगळवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल डी.वाय. पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

जीतनराम मांझी यांचा शपथविधी
पाटणा : जीतनराम मांझी यांनी मंगळवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल डी.वाय. पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मांझी बिहारचे ३२ वे मुख्यमंत्री आहेत. राजभवनात आयोजित समारंभात मांझी यांच्यासह १७ मंत्र्यांनी शपथ घेतली. येत्या २३ मे रोजी विश्वासमत सादर करणार आहेत. मांझी यांच्या पाठोपाठ विजय चौधरी यांनी शपथ घेतली. जतीन राम यांच्या मंत्रिमंडळात दुलाल चंद्र गोस्वामी आणि विनय बिहारी या दोन नव्या चेहर्यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार अपक्ष आहेत. उर्वरित सर्व मंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील आहेत. मंत्रिमंडळात एका महिला सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एका मुस्लीम सदस्याची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी १९ जून रोजी विश्वासमत प्रस्तावाच्यावेळी नितीशकुमार सरकारला चार अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये दौलतचंद गोस्वामी, बिनय बिहार, पवन जयस्वाल आणि सोमप्रकाशसिंग यांच्या समावेश होता. लिपिक ते मुख्यमंत्री जतीनराम मांझी हे राजकारणात येण्यापूर्वी टपाल कार्यालयात लिपिक होते. ते मावळत्या नितीश कुमार सरकारमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कल्याण मंत्री होते. ते जहानाबाद जिल्ह्यातील मुखदूमपूर विधानसभा संघाचे आमदार आहेत. ते राजकारणात दीर्घ काळापासून सक्रिय आहेत. १९८० पासून आतापर्यंत ते काँग्रेस, राजद आणि जदयू राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यातील महाकार गावातील रहिवासी आहेत. ते मांझी ऊर्फ ‘मुसहर’ समाजाचे आहेत. हा समाज उंदीर पकडणे आणि ते खाण्यासाठी ओखळल्या जातो. (वृत्तसंस्था)