Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानातील २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक चिमुरड्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये लंडन येथे राहणारे जावेद अली यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. जावेद हे पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत आले होते. सर्व कामे आटपून परतत असतानाच विमान अपघात त्यांचे संपूर्ण कुटुंब संपले.
अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या १७१ मधील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जावेद अली या एनआरआय कुटुंबाचाही समावेश होता. मूळच मुंबईचे रहिवासी असलेले जावेद अली यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. जावेद अली लंडनहून मुंबईत आले होते आणि त्यांच्या आईवर उपचार करून ते लंडनला जात होते. जावेद अली यांचे कुटुंब लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट AI-१७१ मध्ये बसले होते. पण ही त्याच्या आयुष्यातील शेवटची फ्लाईट ठरेल याची कोणालाच कल्पना नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात जावेद अली (३७ वर्षे), त्यांची पत्नी मरियम अली (३५ वर्षे) आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. जावेदचा आठ वर्षांचा मुलगा झयान अली आणि चार वर्षांची मुलगी अमीन अली यांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. जावेद यांचे कुटुंबिय रुग्णालयामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही अजूनही आशा आहे की, ते यातू बचावले असतील.
जावेद अली ६ दिवसांसाठी भारतात आला होता. तो त्याच्या आईच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आला होता. त्याची पत्नी लंडन येथीलच होती. त्यामुळे ते तिथेच स्थायिक झाले होते. "आईसोबत ईद साजरी करण्यासाठी जावेद मुंबईत आला होता. तिच्यावर सर्व उपचार करुन तो लंडनला जाण्यासाठी निघाला होता. तीन ते चार वर्षांनी तो इथे यायचा. ११ वर्षांमध्ये कधी महत्त्वाचे काम असल्याचे तो इथे यायचा. व्हिडीओ कॉलवर त्याचे आईसोबत रोज बोलणं व्हायचं," असं जावेदच्या भावाने सांगितले.