ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या भारतीय नागरिकांचं दक्षिण तेहरानमधील एका कथित पाकिस्तानी टोळक्याने अपहरण केलं होतं. दरम्यान, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची घोषणा ईराणी दूतावासाने मंगळवारी रात्री केली. दरम्यान, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय या अपहृत भारतीयांना पाकिस्तानात काम करणारे गुप्तहेर म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नात होती, असे या प्रकरणाची हाताळणी करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले.
गेल्या आठवड्यात इराणमधून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी फोन नंबरवरून खंडणीसाठी फोन आले होते. त्यामुळे या घटनेमागील आयएसआयचा हात उघड झाला होता. १ मे रोजी तेहरान येथे पोहोचल्यानंतर हे तिघेही भारतीय तरूण इराणमधून बेपत्ता झाले होते. संगरूर जिल्ह्यातील हुशनप्रीत सिंह, एसबीएसनगरमधील जसपाल सिंह आणि होशियापूर जिल्ह्यातील अमृतपाल सिंह अशी या तीन अपहृत भारतीयांची नावं होती.
पंजाबमधील एका एजंटने या तिघांनाही दुबई-इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता भारत सरकार या एजंटचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान, या तरुणांना ज्याने इराणमध्ये पाठवलं होतं, तो होशियारपूरमधून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.