इराकी अराजकाची भारताला झळ

By Admin | Updated: June 19, 2014 02:35 IST2014-06-19T02:35:38+5:302014-06-19T02:35:38+5:30

सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत

Iraqi Aroajakacha India's Problems | इराकी अराजकाची भारताला झळ

इराकी अराजकाची भारताला झळ

नवी दिल्ली : सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत. उत्तर इराकमधील मोसूल या शहरात एका बांधकाम कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या ४० भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले असून, २४ तास उलटले तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दुसरीकडे इराकमधील या हिंसक संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकू लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर आगामी वर्षात त्याचा किमान २० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असे चित्र आहे.
यातच बीजी शहरातील इराकच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर बंडखोरांनी हल्ला करून त्यावर जवळजवळ कब्जा केल्याने परिस्थितीचे गांभीर्य व प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेच्या धोक्यात आणखी भर पडली आहे. बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या तिकरित शहरात काम करणाऱ्या ४४ भारतीय परिचारिका सुरक्षित असल्याचे समाधान व्यक्त केले जात असतानाच मोसूलमध्ये ४० भारतीय कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त आले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली. या अराजकाच्या परिस्थितीने पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलला १२५ डॉलरपर्यंत वाढतील आणि त्याचा भारताच्या अर्थसंकल्पावर किमान २० हजार कोटी रुपयांचा जादा बोजा पडेल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. इराकमधील घटनांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत ब्रेन्ट तेलाच्या किमती बॅरेलमागे तीन डॉलरने वाढून ११३ डॉलरवर गेल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Iraqi Aroajakacha India's Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.