सरपंचांच्या पतीचा अपमान केला, तरूणाने हात गमावला
By Admin | Updated: August 22, 2014 08:41 IST2014-08-21T14:52:06+5:302014-08-22T08:41:16+5:30
महिला संरपंचांचा पती गावातून जात असताना उभे राहून त्याला सलाम केला नाही म्हणून एका १७ वर्षीय तरूणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे.

सरपंचांच्या पतीचा अपमान केला, तरूणाने हात गमावला
ऑनलाइन लोकमत
मदुराई, दि. २१ - महिला संरपंचांचा पती गावातून जात असताना त्याला उभा राहून सलाम केला नाही म्हणून एका १७ वर्षीय तरूणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. कार्तिक असे त्या मुलाचे नाव असून मंगळवारी ही घटना घडली. नरीकुडी ग्रुप ग्रामपंचायतीमधील सिरूवनूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
गावच्या पंचायत प्रमुख देवी यांचा पती, कृष्णन हा रस्त्यावरून जात असताना कार्तिक घराबाहेर बसला होता, त्याने उठून आपल्याला सलाम कराव अशी कृष्णन यांची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. कृष्णन याला हा आपला अपमान वाटला व त्याने कार्तिकला त्याचा जाब विचारला. त्या वादावादीचे पर्यवसन भांडणात झाले, मात्र गावक-यांनी मधे पडत तो मामला मिटवला.
या प्रकारामुळे कार्तिकची आई घाबरली व त्याच्यावर हल्ला होऊ नये याकरता तिने कार्तिकला तो काम करत असलेल्या शिवगंगा येथे रहायला सांगितले. कार्तिक तेथे जाण्यास निघाला असतानाच कृष्णन व त्याच्या दोन भावांनी त्याला रस्त्यात गाठले व त्यांनी कार्तिकवर हल्ला केला. लगतच्या झाडीत नेऊन त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या डाव्या हाताचा काही भाग तोडला व ते निघून गेले.
काही वेळाने गावक-यांनी कार्तिकला बेशुद्धावस्थेत पाहिले व उपचारांसाठी त्याला लगतच्या रुग्णालयात नेले. तासभरात कार्तिकच्या हाताचा उर्वरित भाग मिळाल्यास तो बसवता येईल, असे डॉक्टरांनी सांगितलले, मात्र हल्लेखोरांनी तो दूर फेकून दिल्याने अंधारात तो शोधणे शक्य झाले नाही. गावक-यांना तो हात दुस-या दिवाशी सकाळी मिळाला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि कार्तिकला त्याचा हात कायमचा गमवावा लागला.
याप्रकरणी मुक्कलम पोलिस स्थानकांत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या तीन आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.