महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
By Admin | Updated: August 16, 2016 00:59 IST2016-08-16T00:59:20+5:302016-08-16T00:59:20+5:30
ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ६.0७ टक्क्यांवर गेला. हा २ वर्षांचा उच्चांक आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर, तेल आणि मसाल्यांची

महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ६.0७ टक्क्यांवर गेला. हा २ वर्षांचा उच्चांक आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर, तेल आणि मसाल्यांची मागणी वाढल्यामुळे महागाई वाढली आहे.
जून २0१५ मध्ये हा निर्देशांक ५.७७ टक्क्यांवर होता. तसेच जुलै २0१५ मध्ये तो ३.६९ टक्के होता. महागाईचा सध्याचा दर सप्टेंबर २0१४ नंतरचा सर्वोच्च दर ठरला आहे. सप्टेंबर २0१४ मध्ये तो ६.४६ टक्क्यांवर होता. खाद्यक्षेत्रातील महागाईचा दर ८.३५ टक्क्यांवर गेला. जूनमध्ये तो ७.७९ टक्क्यांवर होता. केंद्र सरकारने महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमध्ये साखरेचा महागाईचा दर २१.९१ टक्के, तेलाचा दर ४.९६ टक्के आणि मसाल्यांचा दर ९.0४ टक्के होता. फळे, भाज्या आणि डाळीचा महागाईचा दर अनुक्रमे ३.५३ टक्के, १४.0६ टक्के आणि २७.५३ टक्के होता.
ग्रामीण भागातील महागाईचा दर ६.६६ टक्के, तर शहरी भागातील ५.३९ टक्के होता.
कारखाना उत्पादन २.१ टक्क्यांनी वाढले
जून महिन्यात भारताचे औद्योगिक उत्पादन २.१ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र ते कमीच आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात वाढीचा वेग ४.२ टक्के होता. वस्तू उत्पादन आणि भांडवली वस्तू उत्पादनात अवजड बांधकामांचा दर घसरल्याने एकूण औद्योगिक उत्पादनाला फटका बसला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतील कारखाना उत्पादन वाढीचा वेग 0.६ टक्का राहिला.
गेल्या वर्षीच्या तिमाहीत तो ३.३ टक्के होता. मे महिन्याच्या तुलनेत मात्र जूनमधील उत्पादनवाढीचा वेग चांगला राहिला. मे महिन्यात हा दर अवघा १.१ टक्का होता.