घुसखोरीसाठी आटापिटा
By Admin | Updated: January 4, 2015 02:54 IST2015-01-04T02:54:03+5:302015-01-04T02:54:03+5:30
पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात काश्मीरमधील सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद तर एक महिला ठार झाली़

घुसखोरीसाठी आटापिटा
पाकिस्तानची मुजोरी कायम : उखळी तोफांचा मारा; भारतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न
श्रीनगर/जम्मू / नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या नियोजित दौऱ्यापूर्वी भारताला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांचे नऊ गट जम्मू-काश्मीरच्या सीमेतून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत़ त्याचवेळी समुद्रमार्गे घुसखोरीचा प्रयत्न फसल्यानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधी भंगाची मुजोरी सुरूच ठेवली आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात काश्मीरमधील सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद तर एक महिला ठार झाली़ अन्य ११ गावकरी जखमी झाले़ भारतीय हद्दीत आत्मघाती स्फोटात जलसमाधी मिळालेल्या संशयास्पद बोटीबाबत हात वर करणाऱ्या पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याची माहिती आहे.
ओबामा यंदा प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत़ गुप्तचरांच्या अहवालानुसार ओबामांच्या दौऱ्यापूर्वी दहशत निर्माण करण्याचा पाकसमर्थित अतिरेक्यांचे प्रयत्न आहेत़ प्रत्येकी चार ते पाच जणांच्या नऊ गटांत हे अतिरेकी पाकी लष्कराच्या मदतीने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत़ आठवडाभरापासून सांबा सेक्टरमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाआडून घुसखोरांना बळ देण्याचे पाकचे प्रयत्न आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडे म्हटले होते.
च्मुजोर पाकिस्तानने आज शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी भंग करीत, जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील अनेक गावे आणि १३ सीमा चौक्यांना लक्ष्य केले़
च्उखळी तोफांच्या माऱ्यासह पाकी लष्कराने केलेल्या गोळीबारासंदर्भात भारतीय पोलीस अधिकाऱ्यांनी लष्कराने दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत सांगितले की, पाकी सैनिकांनी गत रात्री कन्हैया चौकीनजीक नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि तंगधार भागात उखळी तोफांचा मारा केला़
च्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले तर अन्य एक जवान जखमी झाला़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील गावांना आणि १३ सीमा चौक्यांनाही लक्ष्य करीत, पाकने तुफान गोळीबार केला़ यात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झाले़
च्पाकिस्तानी तोफांच्या माऱ्याने भारताच्या सीमावर्ती भागातील कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील गावांतून १४००हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे़ दोन महिन्यांपूर्वीही पाककडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये १३ जण मृत्युमुखी पडले होते़
च्सीमावर्ती भागांतील ३२ हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले होते़ भारतीय जवानांनीही पाकला ठोस प्रत्युत्तर दिले़
मैत्रीचा हात पुढे करूनही...
पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग थांबवावा़ भारत वारंवार मैत्रीचा हात पुढे करतो आणि पाकिस्तान वारंवार तोंडघशी पडूनही कुरापती करतो़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित करून भारताने एक नवी सुरुवात केली हेती़ पण याउपरही पाक वारंवार शस्त्रसंधी भंग करीत आहे़
नौकेच्या मलब्याचा शोध
गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेबाबतचे गूढ कायम असून, या नौकेचा मलबा शोधण्याची मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली आहे़
‘समजेल अशा भाषेत बोलू’
पाकचा धमकीचा स्वर
इस्लामाबाद : दोन दिवसांपूर्वी भारताकडून सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार जवान ठार झाल्याचा संदर्भ देत पाकिस्तानने शनिवारी अप्रत्यक्षपणे धमकीची भाषा वापरत ‘आता त्यांना समजेल अशा भाषेतच आम्ही त्यांच्याशी बोलू,’ असे म्हटले आहे. संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘शांतता नांदावी यासाठी गेल्या सहा महिन्यांत आम्ही भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना (भारताला) बहुधा ही भाषा समजत नसावी, असे दिसते. त्यामुळे आता भारताला कळेल अशा भाषेतच त्यांच्याशी बोलायला हवे, असे मला वाटते.’ ३१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात गस्त घालणारा एक जवान ठार झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार रेंजर्स मारले गेले होते. त्याचा संदर्भ देऊन ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केले.