आजपासून देशभरात काही नवे नियम लागू झाले आहेत. या नव्या नियमांनुसार रेल्वेने आपल्या तिकिटांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. रेल्वेच्या मेल आणि एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही भाडेवाढ ठळकपणे झाली आहे. ही भाडेवाड अंतराच्या हिशोबाने करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी १ जुलैपूर्वी तिकिटाचं आरक्षण केलं आहे, त्यांना प्रवासादरम्यान, अधिक भाडं द्याव लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत आता रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे रेल्वेने सांगितलं की, ज्या प्रवाशांनी १ जुलैपूर्वी जुन्या तिकीटदरांनुसार तिकीट खरेदी केलेलं आहे.त्यांच्याकडून तिकिटाची वाढीव रक्कम ही वसूल केली जाणार नाही. म्हणजेच टीटीई प्रवासादरम्यान तुमच्याकडून कुठलीही अतिरिक्त रक्कम घेऊ शकणार नाही. तिकीटामधील नवी भाडेवाढ ही १ जुलैपासून लागू होणार आहे. तत्पूर्वीच्या आरक्षित तिकिटांवर ही भाडेवाढ लागू होणार नाही.
रेल्वेच्या तिकिटांवरील भाडेवाढ ही १ जुलै २०२५पासून लागू झाली आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच रेल्वेच्या तिकिटांमध्ये ही भाडेवाढ झाली आहे. तसेच १ जुलैपासून कमाल २ पैसे प्रतिकिमीपर्यंत ही भाडेवाढ करण्यात आली आहे. तर मेल-एक्स्प्रेसमध्ये विना वातानुकूलित सिटचं भाडं हे १ पैसा प्रतिकिमी या दराने वाढलं आहे. तर वातानुकूलित श्रेणीमधील भाडं हे २ पैसे प्रतिकिमी दराने वाढलं आहे.
याबाबत रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सामान्य विना वातानुकूलित ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीसाठी ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. तर ५०१ किमी ते १५०० किमी अंतरापर्यंतच्या तिकिटावर ५ रुपये, १५०० किमी ते २५०० किमीच्या तिकिटावर १० रुपये. २५०० किमी ते ३००० किमीच्या तिकिटावर १५ रुपये एवढी भाडेवाढ झाली आहे. तर प्रथमश्रेणी आणि स्लिपरसाठी अर्धा पैसा प्रतिकिमी एवढी भाडेवाढ झाली आहे.