इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे सर्वात मोठे अण्विक ठिकाण नतांज जवळपास पूर्णपणे नष्ट झाले आहे. याशिवाय, इराणचे अनेक वरिष्ठ अणु वैज्ञानिकही मारले गेले आहेत. या हल्ल्यात इस्रायलने लढाऊ ड्रोन शिवाय लढाऊ विमाने आणि अचूक हल्ला करणाऱ्या मिसाइल्सचाही वापर केला. मात्र, यादरम्यान इराण शत्रूला चोख उत्तर देऊ शकला नाही. यानंतर आता एक प्रसिद्ध भारतीय राजनैतिक तज्ज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी मोदी सरकारला इस्रायली हल्ल्यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले ब्रह्मा चेलानी? - ब्रह्मा चेलानी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, "हवाई युद्धाच्या पहिल्या सिद्धांतानुसार इस्रायलने सुरुवातीच्या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण प्रणाली आणि बॅलेस्टिक मिसाइल लॉन्चर नष्ट केले. यामुळे, इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता कमकुवत झाली आणि इस्रायलचा आत खोलवर मारा करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, भारताच्या राजकीय नेतृत्वाने या मूलभूत सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सुरुवातीला सशस्त्र दलांना केवळ पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवरच हल्ला करण्याचे निर्देश दिले. एक असा दृष्टिकोण ज्यामुळे काही भारतीय लढाऊ विमानांचे नुकसान झाले"
ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय घडलं? - खरे तर, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या काळात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील किमान ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारताचेही नुकसान झाल्याचा दावा अनेक वृत्तांतात करण्यात आला होता. याशिवाय, पाकिस्ताननेही कुठलाही पुरावा न देता अनेक भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले होते. पण काही प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्यही केले होते.
भारताच्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, पाकिस्तानने शेकडो ड्रोन हल्ले करत भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानचे सर्वच्या सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या ११ लष्करी तळांवर हल्ले करत ते नष्ट केले. यात नूर खान एअरबेसचाही समावेश होता, यालाच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे कमांड सेंटरही म्हटले जाते. याशिवाय, भारताने केरणा हिल्सवरही बॉम्बिंग केली. यात पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र सुविधेचे मोठे नुकसान झाले.