नवी दिल्ली - दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दारुगोळा सरकारी मालकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डकडून लष्कराकडील रणगाडे, तोफा एअर डिफेन्स गन आणि अन्य युद्धसामुग्रीसाठी पुरवण्यात येतो. दरम्यान, दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होत असलेल्या अपघातांमुळे चिंतीत असलेल्या लष्कराने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. अशा दारुगोळ्यामुळे अपघात होऊन जवानांना प्राणास मुकत आहेत किंवा जायबंदी होत आहेत. तसेच युद्धसामुग्रीचेही नुकसान होत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात असलेल्या उल्लेखानुसार सरकारी अधिपत्याखालील दारुगोळा कारखान्यांकडून पुरवण्यात येत असलेल्या दारुगोळ्यामुळे वाढत असलेल्या दुर्घटनांमुळे लष्कराचा या सामुग्रीवर असलेला विश्वास कमी झाला आहे. दारुगोळा कारखान्यांकडून दारुगोळ्याच्या दर्जाबाबत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याने लष्कराने संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांच्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्षाकाठी 19 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे दारुगोळा बनवणारे एकूण 41 कारखाने आहेत. हे कारखाने 12 लाख जवान सेवेत असलेल्या भारतीय लष्कराला दारुगोळ्याचा पुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून उप्तादित दारुगोळ्याच्या दर्जात होत असलेल्या घसरणीचा देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान लष्कराकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर संरक्षण उत्पादन सचिव कुमार यांनी लष्कराला त्यांच्या विविध समस्या आपल्यासमोर मांडण्यास सांगितले आहे.
दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 09:31 IST