भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकारणार

By Admin | Updated: August 16, 2015 00:53 IST2015-08-16T00:53:08+5:302015-08-16T00:53:08+5:30

कितीही विरोध झाला आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागते तरी मी भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न साकार करून राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६९ व्या

India will dream of a corruption-free India | भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकारणार

भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकारणार

नवी दिल्ली : कितीही विरोध झाला आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागते तरी मी भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न साकार करून राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करताना दिली.
ते म्हणाले की, गेल्या १४ महिन्यांमध्ये सरकारवर एकाही नव्या पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. तुम्ही मला ज्या भ्रष्टाचारमुक्तीसाठी या पदावर बसविले ते स्वप्न मी साकार करून राहील. भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाला अजूनही समस्यांना सामोरे जावे लागते आहे. भ्रष्टाचार म्हणजे वाळवी आहे. ही वाळवी नष्ट करण्यासाठी वेळोवेळी गरज इंजेक्शनची गरज आहे. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे दलालीचे उच्चाटन करण्यात मदत झाली आहे. गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण संस्थेने भ्रष्टाचाराविरोधात १८०० गुन्हे दाखल केले. त्याआधीच्या वर्षात ८०० गुन्हे नोंदवण्यात आले होते.
काळ्या पैशाचा मुद्दाही पंतप्रधानांनी अधोरेखित केला. ते म्हणाले, काळ्या पैशांसंदर्भात जे काम तीन वर्षे झाले नाही ते आम्ही एका आठवड्यात केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली समिती नेमली. विविध देशांशी सहकार्य करार केले. कठोर कायदा केला. त्यामुळे आता काळा पैसा बाहेर पाठवणे अशक्य आहे. शिवाय, काळा पैसा माफी योजनेनंतर सुमारे ६ हजार ५०० कोटी रुपये बाहेर आल्याचेही त्यांनी भाषणात नमुद केले.
पंतप्रधानांनी कोळसा, स्पेक्ट्रम आणि एफ.एम. रेडियोच्या परवान्यांची उदाहरणे दिली. ते म्हणाले, कोळसा खाणींचा नव्याने पारदर्शक पद्धतीने लिलाव केल्यामुळे सरकारी तिजोरीत ३ लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. त्यातील १ हजार १०० कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. ‘एफएम’ रेडिओ लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केला जाऊ नये म्हणून दबाव आला होता. मात्र आम्ही तो झुगारुन लावला. सध्या ८०-८२ शहरात हा लिलाव सुरू आहे. त्याची रक्कम आताच हजारो कोटींच्या पुढे गेली आहे. ही रक्कम भविष्यात गरिबांच्या कामाला येणार आहे. ते म्हणाले की, अटल पेन्शन योजना, जीवन सुरक्षा विमा योजना अशा योजनांच्या माध्यमातून गरीबांना आम्ही आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अनेकांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना विविध लाभ मिळणार आहेत. कामगार भविष्यनिर्वाह निधीमध्ये पडून असलेले कामगारांचे २७ हजार कोटी रुपये देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
सव्वा लाख बँक शाखांपैकी प्रत्येक शाखेने किमान एका दलित किंवा आदिवासी उद्योजकाला आणि किमान एका महिला उद्योजिकेला प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

‘पहल’ने १५ हजार कोटींची बचत
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट हस्तांतरीत करणाऱ्या ‘पहल’ योजनेमुळे १५ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. बिगर-कृषी कामांसाठी अनुदानित युरिया वळवण्याची पध्दत बंद करण्यासाठी ‘कडुनिंबाचा भर असलेल्या युरिया’ची मदत झाली आहे.

१८,५००
गावांना वीज देणार
२०२२ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा तसेच सर्वांना घरे आणि विजेसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पुढील एक हजार दिवसांत सर्व १८ हजार ५०० गावे जी अद्याप अंधारात आहेत. त्यांना वीज पुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प आहे.

कनिष्ठ स्तरावरील
भरती प्रक्रिया आॅनलाइन
कनिष्ठ स्तरवरावर भरती करताना ज्या मुलाखती घेण्यात येतात
त्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह आहे.
ही पध्दत लवकरात लवकर
बंद करण्यात यावी. केवळ पारदर्शक आॅनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून भरती करून गुणवत्तेला प्रोत्साहन द्या.

गरिबांची श्रीमंती प्रतिबिंबित
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी केलेल्या काही संकल्पांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. राज्यांच्या सहकार्याने सर्व शाळांमध्ये शौचालये बांधण्याचे वचन जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले. आर्थिक समावेशकतेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून १७ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. जन-धन खात्यात जमा झालेल्या २० हजार कोटी रुपयांवरून भारतातील गरीबांची श्रीमंती प्रतिबिंबित होते आहे.

 

Web Title: India will dream of a corruption-free India