भारत - ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाबाबत चर्चा
By Admin | Updated: February 23, 2017 00:53 IST2017-02-23T00:53:58+5:302017-02-23T00:53:58+5:30
आरोपींचे प्रत्यार्पण करून, त्यांना स्वदेशी परत पाठविण्याच्या मुद्द्यावरील प्रलंबित प्रकरणांवर मंगळवारी भारत आणि

भारत - ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाबाबत चर्चा
नवी दिल्ली : आरोपींचे प्रत्यार्पण करून, त्यांना स्वदेशी परत पाठविण्याच्या मुद्द्यावरील प्रलंबित प्रकरणांवर मंगळवारी भारत आणि ब्रिटन यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन विभागाचे संयुुक्त सचिव यांनी आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे विनंती केल्यानंतर काही आठवड्यातच ही बैठक झाली आहे, हे विशेष.
मनी लाँड्रिंग प्रकरणात विजय मल्ल्याच्या विरोधात चौकशी सुुरू आहे. विजय मल्ल्या याच्यावर बँकांचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. ब्रिटनमधून भारतात परत पाठविण्याच्या प्रकरणासह अन्य प्रकरणांवर यात चर्चा झाली.
नोव्हेंबरमध्ये भारताने ब्रिटनमधून मल्ल्यासह ६० जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. शस्त्रास्त्र खरेदीतील दलाल संजय भंडारी हाही ब्रिटनमध्ये असून, तोही भारताला हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान टेरेसा मे यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ब्रिटनला त्या ६0 जणांची यादीही सोपविण्यात आली होती.
ब्रिटननेही भारताला १७ लोकांची यादी सोपविली होती. भारतानेही त्या १७ जणांना ब्रिटनमध्ये परत पाठविणे अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताला हवा आहे मल्ल्या
या बैठकीची अधिकृत माहिती समजू शकली नसली, तरी विजय मल्ल्याला परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केल्याचे समजले जात आहेत.
मल्ल्यासह ६० जण भारताला हवे आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या भारतातून पळून गेला असून, तो सध्या ब्रिटनमध्ये आहे. त्याने देशातील बँकांचे कोट्यवधींचे कर्ज थकविले आहे.