बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. तसेच सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्कं करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवास्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवास्थानी आरजेडीचे आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी आम्हाला चोरटा आमदार नको, सतीश कुमार यांना हरवायचं आहे, अशी घोषणाबाजी केली.
बिहारमधील मखदुमपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्ते आज मखदुमपूर विधानसभा मतदारसंधातून पाटणा येथे आले होते. कार्यकर्ते अचानक लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी घुसले. विद्यमान आमदार सतीश कुमार यांनी कुठलंही काम केलेलं नाही. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली.
विरोधानंतरही राष्ट्रीय जनता दलाने सतीश कुमार यांना उमेदवारी दिली तर जनता याला विरोध करेल, असा इशारा आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना दिला. सतीश कुमार यांच्याऐवजी मतदारसंघाचा विकास करणाऱ्या आणि लोकहिताची काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्व केला. मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होती. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीच्या नेतृत्वाची अडचण वाढली आहे. तसेच तिकीट वाटपावरून अंतर्गत विरोधही वाढला आहे. तसेच मखदुमपूर येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहिला आहे.
Web Summary : RJD workers protested at Lalu Yadav's residence in Bihar, opposing incumbent MLA Satish Kumar's candidacy. They allege inaction and demanded a new candidate focused on constituency development, creating turmoil for RJD leadership before elections.
Web Summary : बिहार में लालू यादव के आवास पर आरजेडी कार्यकर्ताओं ने मौजूदा विधायक सतीश कुमार की उम्मीदवारी का विरोध किया। उन्होंने निष्क्रियता का आरोप लगाया और निर्वाचन क्षेत्र के विकास पर ध्यान केंद्रित करने वाले एक नए उम्मीदवार की मांग की, जिससे चुनाव से पहले आरजेडी नेतृत्व में उथल-पुथल मची हुई है।