‘सबका खिचडा साफ कर दूंगा’

By Admin | Updated: March 27, 2017 04:15 IST2017-03-27T04:15:21+5:302017-03-27T04:15:21+5:30

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले

'I will clear all khichadas' | ‘सबका खिचडा साफ कर दूंगा’

‘सबका खिचडा साफ कर दूंगा’

गोरखपूर : योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर  रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले व ‘ मौका मिला है तो दो महिनोंमे सबका खिचडा साफ कर दूंगा’ असे सांगत त्यांनी सरकार कसे चालवायचे दे दाखवून देण्याची ग्वाही दिली.
आपल्या राज्यात गुंडगिरीला अजिबात थारा दिला जाणार नाही व त्यासाठी लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाईल, असे संकेत देत आदित्यनाथ म्हणाले की, गुंडगिरी, माफिया यांना आश्रय देणाऱ्यांनी हवे तर उत्तर प्रदेश सोडून जावे. अन्यथा त्यांची रवानगी योग्य ठिकाणी (तुरुंगात) केली जाईल.
ते म्हणाले की, ज्याच्या सीमांपासून अंधाराची सुरुवात होते, जेथे रस्त्यांच्या ऐवजी खड्डे सुरु होतात व जेथे महिलांना बाहेर फिरणे असुरक्षित वाटते असे राज्य अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशची तयार केली गेली आहे. मी हे सर्व बदलून टाकण्याचा निश्चय केला आहे.
मौज-मस्ती करण्याचे दिवस आता संपले आहेत. आता दिवसाला १८-२० तास काम करण्याची गरज आहे. ज्यांची असे करण्याची तयारी आहे त्यांनीच माझ्यासोबत राहावे. इतरांना मार्ग मोकळे आहेत, असेही आदित्यनाथ म्हणाले.
मंत्र्यांच्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे लोकांसाठी सदैव उघडे असायला हवेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोहोचू शकेल. त्यामुळेच कोणावरही उपाशीपोटी झोपण्याची पाळी येणार नाही व कोणाही मुलीचा विवाह कोणत्याही अडचणीमुळे अडून राहणार नाही. (वृत्तसंस्था)

मांस विक्रेत्यांचा संप
अवैध आणि यात्रिक कत्तलखान्यांविरुद्ध राज्य सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील सर्व मांस आणि मासळी विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुद संपावर जायचे ठरविले आहे. दरम्यान, लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसारच कत्तलखान्यांविरुद्ध ही कारवाई केली जात असल्याचे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा दिल्लीत म्हणाले.

Web Title: 'I will clear all khichadas'