मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील नारायणगड पोलीस स्टेशन परिसरातील चकारिया गावात एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी आहे. उपमुख्यमंत्री जगदीश देवदा या घटनेला दुजोरा दिला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंदसौर जिल्ह्यातील कचारिया गावात एका भरधाव इको कारने आधी एका दुचाकीला धडक दिली, नंतर कार विहिरीत पडली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व 14 जणांना विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून 12 जखमींना मृत घोषित केले, तर उर्वरित चार जणांवर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त इको व्हॅन गॅसवर चालत होती, त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू झाली, असे सांगितले जात आहे. यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. गॅसमुळे गुदमरुन गाडीतील पुरुष आणि महिला वेदनेने तडफडू लागल्या. घटनास्थळी गोंधळ उडाला. यादरम्यान, एका स्थानिक तरुणाने कारमधील जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, परंतु गॅस गळतीमुळे गुदमरल्याने त्याचाही मृत्यू झाला.
एक एसडीआरएफ जवान ऑक्सिजन सिलेंडरसह विहिरीत उतरला, पण घाबरल्यामुळे तोही बाहेर आला. शेवटी एका क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच, त्या परिसरात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री जगदीश देवदा घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य संपेपर्यंत उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि एसपींसह घटनास्थळावरच टळ ठोकून होते.