नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या भाषावादावरून पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे. देशात JEE, NEET आणि CUET च्या परीक्षा एकूण ३ भाषांमध्ये होत आहेत. याआधी CRPF कॉन्स्टेबल भरतीसाठी लोकांकडे हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय होता. केवळ या दोन भाषेतच अर्ज भरू शकत होता मात्र आम्ही त्यात अन्य १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली. देशातील ९५ टक्के उमेदवार आज त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देत आहेत. येणाऱ्या काळात भारतीय भाषांचे भविष्य उज्ज्वल आहे असं शाह यांनी म्हटलं आहे.
हिंदी कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषा मिळून आपल्या स्वाभिमान कार्यक्रमाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहचवू शकतात. मागील काही दशकांपासून भाषेचा वापर भारतात विभागणी करण्यासाठी होत आहे. ते भारताला तोडू शकत नाहीत पण प्रयत्न करतायेत. आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील हे आम्ही करू. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिकाधिक भाषा विभागावर काम करत आहोत. २०४७ मध्ये महान भारत विकसित होईल. यात भारतीय भाषांच्या विकासासाठी, समृद्धतेसाठी त्याचा वापर वाढेल असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय सरकारी कामकाजात भारतीय भाषांचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा. हे काम केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारनेही करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व राज्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना समजावून तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही अमित शाह यांनी म्हटलं.
६ जुलैला महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात मोर्चा
पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चाला कोणताही झेंडा नसणार आहे. फक्त मराठी हाच या मोर्चाचा अजेंडा असणार आहे, असे राज म्हणाले. तसेच राज यांनी या हिंदी सक्तीविरोधात सर्व राजकीय पक्षांनी या सामील व्हावे असे आवाहन केले आहे. राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने मोर्चात सामील व्हावे असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.