Kedarnath Helicopter Crash:केदारनाथमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राती भाविकांचाही समावेश आहे.
रविवारी सकाळी उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आणखी एक हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते आणि ते गौरीकुंडजवळ बेपत्ता झालं होतं, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली.
देहरादूनहून केदारनाथला जात असताना आज सकाळी त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. काही महिलांनी अपघाताबद्दल सांगितले. अपघाताच्या वेळी गौरीकुंडवर गवत कापत असताना त्यांनी अपघात पाहिला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. हेलिकॉप्टर गौरी माई खार्कच्या वरच्या जंगलात पडले आहे. मृतदेह हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हेलिकॉप्टर अपघातात बीकेटीसी कर्मचारी विक्रम सिंह रावत यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने हेलिकॉप्टर अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे. "श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर आज सकाळी ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा प्रवासी होते ज्यामध्ये दोन वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. हेलिकॉप्टरमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी २ आणि उत्तराखंड, राजस्थान आणि गुजरातमधील प्रत्येकी १ प्रवासी होता. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएप आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.
सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण विमानात होते. हेलिकॉप्टरमध्ये राजवीर (पायलट), विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी (वय १० वर्षे) असे प्रवासी होते. केदारनाथ येथे दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर रस्ता चुकले. त्यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते कोसळल्याचे म्हटलं जात आहे.