महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर भागांतही मुसळधार पावसाचा कहर दिसून येत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून, पाण्यात विजेचा प्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये शहरात ३५० मिमी हून अधिक पाऊस पडला असून, त्यामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे.
रात्रभर पडलेल्या पावसामुळे महानायक उत्तम कुमार आणि रवींद्र सरोवर स्थानकांदरम्यान पाणी साचलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहीद खुदीराम बोस आणि मैदान स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच दक्षिणेश्वर आणि मैदान स्टेशनदरम्यान मर्यादित प्रमाणात मेट्रो चालवण्यात येत आहेत. पंपाचा वापर करून पाणी बाहेर काढले जात आहे. तसेच मेट्रो रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वाहनांची ये जा थांबली आहे. मेट्रो आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच अनेक घरे आणि निवासी क्षेत्रात पाणी घुसले आहे.
उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये बनलेल्या कमी दबावाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच २५ सप्टेंबरच्या दरम्यान, पूर्व-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरादरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखी पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.