Harish Rana: "सगळ्यांना माफ करत आणि सर्वांची माफी मागत जा हरीश... आता तुझ्या वेदनांचे फक्त काही क्षण उरले आहेत," या अत्यंत भावूक शब्दांत ब्रह्माकुमारी भगिनींनी हरीश राणा याला अखेरचा निरोप दिला. गेल्या १३ वर्षांपासून वेजिटेटिव्ह स्टेटमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या ३२ वर्षीय हरीशला सुप्रीम कोर्टाने इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. भारताच्या कायदेशीर इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जात असून, शनिवारी सकाळी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
४,५८८ दिवसांचा संघर्ष आणि पालकांचा काळजावर दगड
हरीशचे वडील अशोक राणा यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले, "आम्ही या वेदनेसोबत ४,५८८ दिवस काढले आहेत. आपल्या स्वतःच्या मुलाचे दुःख संपवण्यासाठी त्याला मृत्यूकडे पाठवण्याचा निर्णय घेणे, हे त्या वेदनेपेक्षाही भयानक आहे."
२०१३ मध्ये चंदीगडमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना हरीश चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो १०० टक्के अपंग झाला. तेव्हापासून तो अंथरुणावरच होता, त्याला नळीवाटे जेवण आणि श्वास दिला जात होता.
ब्रह्माकुमारींकडून भावूक निरोप
हरीशचे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून ब्रह्माकुमारी केंद्राशी जोडलेले आहे. तो दवाखान्यात रवाना होण्यापूर्वी मोहन नगर येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका बीके लवली दीदी आणि इतर भगिनींनी त्याच्या राजनगर एक्सटेंशन येथील घरी जाऊन निरोप दिला. "प्रिय हरीश, तू बोलू शकत नव्हतास की हसू शकत नव्हतास, पण तरीही तुझ्या आई-वडिलांसाठी तूच सर्वकाही होतास. आता तुझी या कष्टातून सुटका होण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत त्यांनी हरीशला निरोप दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
एम्समध्ये 'सन्मानजनक' निरोपाची तयारी
सुप्रीम कोर्टाने ११ मार्च रोजी हरीशच्या पालकांची याचिका मान्य करत त्याला सन्मानपूर्वक मृ्त्यूचा अधिकार दिला. एम्समधील डॉक्टरांची एक विशेष टीम आता हरीशचे लाइफ सपोर्ट सिस्टम हळूहळू काढून घेईल. ही प्रक्रिया अत्यंत कायदेशीर आणि वैद्यकीय देखरेखीखाली पार पडेल, जेणेकरून हरीशचा नैसर्गिक मृत्यू होईल.
काय आहे पॅसिव्ह युथनेशिया?
जेव्हा एखादा रुग्ण अशा आजाराने ग्रस्त असतो की तो कधीच बरा होऊ शकत नाही आणि केवळ मशीनच्या सहाय्याने जिवंत असतो, तेव्हा त्याचे उपचार किंवा लाइफ सपोर्ट थांबवून त्याला नैसर्गिक मृत्यूकडे जाऊ देणे, याला पॅसिव्ह युथनेशिया म्हणतात.
Web Summary : Harish Rana, in a vegetative state for 13 years, received court permission for passive euthanasia. His family bid a tearful farewell as he was moved to AIIMS, Delhi, where life support will be gradually withdrawn, allowing a natural death. This marks a legal first in India.
Web Summary : 13 वर्षों से वेजिटेटिव अवस्था में रहे हरीश राणा को निष्क्रिय इच्छामृत्यु की अदालत ने अनुमति दी। परिवार ने नम आंखों से विदाई दी क्योंकि उन्हें एम्स, दिल्ली ले जाया गया, जहाँ धीरे-धीरे लाइफ सपोर्ट वापस ले लिया जाएगा, जिससे स्वाभाविक मृत्यु हो सके। यह भारत में कानूनी रूप से पहली घटना है।