बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका ग्रॅज्युएट मुलीने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केलं, जो आठवीत नापास झाला होता. तिने एक व्हिडीओ काढला आणि ती स्वतःच्या मर्जीने पळून गेली आहे, तिचं अपहरण झालेलं नाही. तिचे कुटुंब तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न लावत होते असं सांगितलं. मुलीने तिच्या वडिलांचे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि पोलिसांकडे मदत मागितली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा मुलीला कुंकू लावताना दिसत आहे. सोबत वकीलही आहेत. याचाच अर्थ व्हायरल व्हिडीओ न्यायालयाच्या परिसरातील आहे. लग्न झाल्यानंतर मुलगी पुढे येते आणि सांगते की, तिने स्वतःच्या मर्जीने न्यायालयात लग्न केलं. यामध्ये कोणाचाही दबाव नव्हता.
तरुणीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, माझं अपहरण झालं नाही. मी स्वतःच्या मर्जीने घरातून निघून गेली. कारण कुटुंबातील सदस्य माझ्या इच्छेविरुद्ध माझं लग्न दुसरीकडे लावत होते. म्हणूनच मी हे पाऊल उचललं. याच दरम्यान, तिने तिच्या वडिलांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. मुलीने पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली आहे.
तरुणी म्हणाली की, "मी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं आहे. माझा पती आणि त्याच्या कुटुंबावर जो काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो योग्य नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत आणि म्हणत आहेत की तू जिथे दिसशील तिथे तुला मारून टाकू. अशा परिस्थितीत मला पोलीस प्रशासनाची मदत हवी आहे. जेणेकरून आम्हाला सुरक्षित राहता येईल."