शेअर बाजारात दिसला चांगला दिवस (सुधारित)
By Admin | Updated: May 18, 2014 00:14 IST2014-05-17T23:52:28+5:302014-05-18T00:14:45+5:30
नवा उच्चांक : नाशिकमध्येही झाली कोट्यवधींची उलाढाल

शेअर बाजारात दिसला चांगला दिवस (सुधारित)
नवा उच्चांक : नाशिकमध्येही झाली कोट्यवधींची उलाढाल
नाशिक : लोकसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच शेअर बाजारात सुरू झालेली चढउतार प्रत्यक्ष निकालानंतरही तशीच राहिली. बाजाराच्या अपेक्षेपेक्षाही स्थिर आणि एकाच पक्षाचे सरकार आल्याने शेअर बाजारात एकाच दिवसात मोठ्या रकमेची उलाढाल झाली. त्यात नाशिककरांनीही प्रॉफिट बुकिंग करून ऐतिहासिक उलाढालीत आपला सहभाग नोंदविला.
शुक्रवारी बाजार उघडताच निर्देशांक वर होता. २४ हजार २७१ वर उघडलेला बाजार २५,३७५ या उच्चांकाला स्पर्श करून आला. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात सुरू असलेली हालचाल निवडणूक निकालांबाबत बरीच बोलकी ठरत होती. भाजपाप्रणीत सरकार येईल, अशी अपेक्षा असताना, भाजपालाच पूर्ण बहुमत मिळाल्याने अर्थकारणाविषयी ठोस निर्णय घेता येतील, या अपेक्षेने बाजारात अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. त्यामुळे बाजार उघडल्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने विक्रमी पातळी ओलांडली.
या दिवसभरात निर्देशांकाने मोठी झेप घेत पुन्हा घसरण अनुभवली. त्यामुळे दिवसभरात २००० हून अधिक अंकांची चढउतार निर्देशांकात दिसून आली. या मोठ्या उलाढालीत खरेदी करणारे आणि विक्री करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे निर्देशांक वाढताच विक्रीचा माराही सुरू झाला आणि निर्देशांक कोसळला. तरीही बाजार बंद होताना निर्देशांक २०० अंकांनी वरच राहिला. आता काही दिवस निर्देशांक याच पातळीवर राहील आणि वर्षभरात निर्देशांक ३० हजाराला स्पर्श करेल, असा अंदाज बाजारातून व्यक्त होतो आहे.
सामान्य गुंतवणूकदारांनी दूर राहावे
बाजारात सुरू असलेल्या या चढउतारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. दिवसभरात बाजाराने खूप चांगली कामगिरी केली आहे. खरेदीदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे एक तास वर असणारा बाजार सायंकाळपर्यंत खाली आला. तरीही स्थिर सरकार आणि भाजपा पूर्ण बहुमतात आल्यामुळे बाजारात वाताहत झाली नाही. बंद होतानाही बाजाराचा निर्देशांक २०० ने वरच राहिला. यानंतरही सरकारसमोर असणार्या परकीय निधीची कमतरता आणि जीडीपी ग्रोथ या दोन मुद्द्यांवर बाजारात निर्देशांक कार्य करेल. या दरम्यान सामान्य गुंतवणूकदारांनी बाजारापासून लांब राहिलेलेेच बरे.
- वृषाल सौदागर (कंपनी सचिव)
इतिहासात प्रथमच मोठी उलाढाल
बाजाराला स्थिर सरकार अपेक्षित होते त्यापेक्षा चांगले सरकार आले. एकट्या भाजपाचे सरकार आल्याने शेअर बाजाराच्या दृष्टीने चांगले वातावरण आहे. यानंतरही निर्देशांकात १००० अंकांचा फरक होऊ शकेल. त्यानंतर निर्देशांक ३० हजारांपर्यंत जाऊ शकेल. या प्रॉफिट बुकिंगमध्ये नाशिककरांनी चांगली संधी साधली. बाजारात अनेक दिवसांपासून कॉल-पुट पद्धतीने होणार्या उलाढालीत झालेली गुंतवणूक आज लिक्वीडेट झाली. त्यात ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. नाशिकमधूनही अनेकांनी ही संधी साधली. देशाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक निकालाच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली असेल.
- सुरेश लोया (प्रमुख, मोतीलाल ओसवाल ग्रुप)