सोने वितळविण्याने भावनांनाच ठेच!
By Admin | Updated: December 20, 2015 23:46 IST2015-12-20T23:46:14+5:302015-12-20T23:46:14+5:30
देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोने वितळविण्याने भावनांनाच ठेच!
नवी दिल्ली : देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने मोठमोठे सुवर्णभंडार असलेल्या मंदिरावर नजर ठेवून ही योजना आखली असली तरी अनेक मंदिरांचे ट्रस्टी किंवा संचालकांनी सोने वितळविले जाणार असल्यामुळे धार्मिक भावनांना ठेच लागण्याचा मुद्दा उपस्थित करीत चिंता व्यक्त केली आहे.
सरकारच्या सुवर्ण मौद्रिकरण योजनेत तत्काळ सहभाग नोंदविणे आमच्यासाठी कदाचित शक्य होणार नाही. ही योजना विचारात घेण्याजोगी असली तरी त्याबाबत अद्याप ठाम निर्णय घेतलेला नाही, असे काही मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. कुबेराचा खजिना मानले जाणारे केरळचे प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर, महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर आणि अन्य काही मंदिरांबाबत कनिष्ठ न्यायालयात चालत असलेले मुद्दे मार्गात अडसर बनले आहेत.
सिद्धिविनायक मंदिराची तयारी...
मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने या योजनेत रुची दाखविली आहे. या मंदिराकडे असलेले १६० किलो सोन्याच्या भंडाराचा उपयोग करण्याच्या विविध पर्यांयावर विचार केला जात आहे. या मंदिराने सुमारे १० किलो सोने याआधीच बँकेकडे जमा केले आहे. प्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या उच्चस्तरीय गुंतवणूक समितीने लवकरच बैठक आयोजित केली आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कनकदुर्गाम्मा मंदिराने सहभागी होण्यावर विचार केलेला नाही.
गुजरातमधील प्रसिद्ध अंबाजी मंदिराने तूर्तास या योजनेत सोने जमा करण्यास नकार दिला असला तरी सोमनाथ मंदिराने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. अंतिम निर्णय मंदिरांचे विश्वस्त घेतील. द्वारकाधीश मंदिराच्या न्यास समितीचे अध्यक्ष एच.के. पटेल यांनी ही योजना विचार करण्यायोग्य असल्याचे स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
अनेक भाविक मंदिरांना देवी- देवतांच्या नावावर सोने भेट देतात. दान केलेले सोन्याचे दागिने किंवा विविध आभूषणे वितळविताना सोन्याचा ऱ्हास होऊन मूल्य कमी होत असल्यामुळेही अनेक देवस्थानांनी चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण मौद्रिकरण योजनेनुसार धार्मिक संस्था, अनेक ट्रस्ट किंवा घरांघरांमध्ये पडून असलेले २२ हजार टन सोने आर्थिक प्रवाहात आणण्याचा उद्देश होता. आभूषणांच्या स्वरूपातील सोने जमा केले जात असले तरी बँकाकडून सोने वितळवूनच त्याची शुद्धता आणि मूल्य निश्चित केले जाते.