चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्टÑ समिती तेलंगणमधील पहिले सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून, विधानसभेच्या ११९ जागांपैकी तेरासला ६२ जागा मिळाल्या आहेत. तेदेपा - भाजपा युतीला २३ जागा, तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. केसीआर यांचा गजवेल मतदारसंघात १९,३३३ मतांनी विजय झाला आहे, त्यांनी तेलगू देसमचे उमेदवार व्ही प्रताप रेड्डी यांचा पराभव केला आहे. केसीआर यांचे भाचे टी हरिश राव हे सिद्दीपेट विधानसभा मतदारसंघात ९३ हजार मतांनी जिंकले; पण २०१० च्या पोटनिवडणुकीतील ९५ हजार मतांनी विजयी होण्याचा स्वत:चा उच्चांक त्यांना मोडता आला नाही. तेलंगण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला असून, तेलंगण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पोनल्ला लक्ष्मय्या यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंहा, एम डी श्रीनिवास, माजी विधानसभा अध्यक्ष के आर सुरेश रेड्डी, के सुधाकर रेड्डी, व्ही सुनीता लक्ष्मा रेड्डी यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. काँग्रेस नेता व माजी मंत्री डी श्रीधर बाबू यांचा पराभव तेरासच्या पुट्टा मधू यांनी केला. पुट्टा मधू हे वायएसआर काँग्रेसमधून अलीकडेच तेरासत आले होते. एमआयएम या पक्षाचा प्रभाव या निवडणुकीत कमी झाला असून पक्ष फक्त हैदराबादपुरताच मर्यादित राहिला आहे.
‘तेरास’चेच पहिले सरकार
By admin | Updated: May 17, 2014 04:32 IST