देशात भय, दबावाचे वातावरण

By Admin | Updated: June 10, 2015 00:19 IST2015-06-10T00:19:11+5:302015-06-10T00:19:11+5:30

आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याची परवानगी देऊन मोदी सरकार ‘धोकादायक दुटप्पी डाव’ खेळत आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

Fear, pressure atmosphere in the country | देशात भय, दबावाचे वातावरण

देशात भय, दबावाचे वातावरण

सोनिया गांधी : काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; मोदी सरकारवर घणाघाती हल्ला

नवी दिल्ली : अपयश आणि नैराश्य झटकून कामाला लागलेल्या काँगे्रसने मंगळवारी बोलवलेल्या काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याची परवानगी देऊन मोदी सरकार ‘धोकादायक दुटप्पी डाव’ खेळत आहे. जातीय धु्रवीकरण करण्याचे सरकारचे मनसुबे आहेत, असा आरोप सोनियांनी यावेळी केला.
गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच दिल्लीत नऊ काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक दिवसीय बैठक आयोजित केली गेली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, संरक्षणमंत्री ए.के.अ‍ॅन्टोनी, पक्षाचे सरचिटणीस आणि अन्य पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
बैठकीला संबोधित करताना सोनियांनी सर्व काँग्रेसजनांना मोदी सरकारविरोधात कंबर कसून मैदानात उतरण्याचे आवाहन केले. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री या नात्याने तुम्हाला केंद्र सरकारसोबत सहकार्याच्या भूमिकेतून काम करावे लागेल. पण एक काँग्रेसजन या नात्याने मोदी सरकारच्या चुकीच्या ध्येय-धोरणांना विरोध करणे हेही तुमचे कार्य आहे, असे त्या म्हणाल्या. भूसंपादन विधेयक आणि अन्न सुरक्षा मुद्यावर सरकारच्या भूमिकेला जोरकस विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कल्याणकारी राज्याची संकल्पना ध्वस्त करण्याचे मोदी सरकारचे सुनियोजित प्रयत्न आहेत. एकीकडे पंतप्रधान मोदी सुशासनाचा दावा करतात. घटनात्मक मूल्यांचे रक्षणकर्ते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तर दुसरीकडे आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि समाजात दुफळी निर्माण करण्याची मुभा देतात. मोदी कार्यकाळात जाणीवपूर्वक भय आणि दबावाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सोनिया यावेळी म्हणाल्या.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा वारसा नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. योजना आयोग संपुष्टात आणणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत क्षेत्रास ६७ टक्क्यांवरून ४० टक्के करण्याचा प्रस्ताव तसेच शिक्षण, आरोग्य, पेयजल, स्वच्छता, रस्ते, महिला व बालविकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीत घट चिंताजनक असल्याचेही त्या म्हणाल्या.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

हीच मोदी सरकारची वैशिष्ट्ये
> सत्ता आणि अधिकारांचे केंद्रीकरण, संसदीय प्रक्रिया आणि नियमांचे अवमूल्यन, नागरी समाज आणि न्यायपालिकेस धमक्या ही मोदी सरकारची वैशिष्ट्ये आहेत, अशी उपहासात्मक टीका सोनिया गांधी यांनी केली.
‘मार्केटिंग स्कील’चा विकास करा
> आपल्या भाषणात सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वत:मधील ‘मार्केटिंग स्कील’ विकसित करण्याचा ‘गुरुमंत्र’ दिला. आपली चांगली कामे आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवा. गत निवडणुकीत आपण हेच शिकलो. वेगाने बदलत असलेल्या तांत्रिक युगात आपले म्हणणे व आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. प्रचार तंत्रावर भर देण्याची गरज आहे, असे सोनिया यावेळी म्हणाल्या.

मनमोहनसिंगांनी व्यक्त केली चिंता
> योजना आयोग ‘घाईघाईत’ गुंडाळून त्याजागी नीति आयोग आणण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. दुर्बल राज्ये आणि उपेक्षित भागांना मदतगार ठरणारा योजना आयोग संपुष्टात आणणे, ही माझ्यासाठी चिंतीत करणारी बाब आहे.
> नीति आयोगापेक्षा योजना आयोग सरस होता. योजना आयोगाच्या माध्यमातून राज्यांचे प्रश्न, समस्या संबंधित मंत्रालयापर्यंत पोहोचत. नीति आयोगाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या विशेष दर्जा असलेल्या राज्यांसाठी कुठलेही विशेष निर्देश नाहीत,असे मला वाटते, असे मनमोहनसिंग म्हणाले.

काहीतरी ‘वेगळे’ करा- राहुल
> आपल्या भाषणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना काहीतरी वेगळे करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक कॉंग्रेसशासीत राज्याने आपापल्या राज्यात दोन तीन परिवर्तनकारी, क्रांतिकारी योजना राबवण्यावर लक्ष केंद्रीत करून देशात सर्वाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा आणि काँग्रेसशासित नऊ राज्ये देशातील सर्वोत्कृष्ट राज्ये आहेत, हे लोकांना दाखवावे, असा सल्ला त्यांनी दिला. काँगे्रसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपली बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या जोरावर हे करू शकतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Web Title: Fear, pressure atmosphere in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.