Farmers Protest : नवी दिल्ली : शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा आता १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही नेहमीच चर्चेचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे दोन्ही संघटनांनी १४ डिसेंबरला १०१ शेतकऱ्यांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवार) शेतकरी आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाईल. तसेच, आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची आमची मागणी आहे, असे सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.
याचबरोबर, सर्वनसिंह पंढेर यांनी पंजाबमधील सर्व गायक आणि प्रसिद्ध व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्या मागण्यांसाठी सीमेवर अनेक महिने बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले.दरम्यान, यापूर्वी, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने ६ आणि ८ डिसेंबर रोजी पायी दिल्लीला जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते, परंतु हरयाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.
८ डिसेंबर रोजी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना मागे हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकरी जखमीही झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.