निधीअभावी हदगावातील ८३ पाणंद रस्ते फसले
By Admin | Updated: May 23, 2014 01:11 IST2014-05-23T00:28:06+5:302014-05-23T01:11:13+5:30
सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़

निधीअभावी हदगावातील ८३ पाणंद रस्ते फसले
सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़ परंतु एका वर्षापासून निधी अभावी हे रस्ते चिखलात रुतले असून शेतकर्यांना अडचणी येत आहेत़ २००३ पासून पाणंद रस्त्याची संकल्पना समोर आली़ शेतातील माल वाहतूक करण्यासाठी, बी-बियाणे व खतपाणी शेतात नेण्यासाठी शेतकर्यांना हक्काचा रस्ता मिळावा, ही त्यामागची संकल्पना होती़ एक एकर जमीन पडीक राहिली तरी चालेल, परंतु धुर्यासाठी भांडणे करणार्या असंख्य शेतकर्यांना त्यांचा हक्काचा पक्का रस्ता मिळावा, यासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच प्रयत्न झाला़ यासाठी अनेक गावांनी चांगला प्रतिसाद दिला व पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला त्रास कायमचा संपला़ ही संकल्पना इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेडमध्येही राबविली़ हदगाव तालुक्याचे तत्कालीन एसडीएम राजेंद्र खंदारे यांनी तर विशेष प्रयत्न केले़ तालुक्यात ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या़ रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले व शेतकर्यांची मानसिकताही तशी बनविली़ यासाठी लाखो रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला़ तालुक्यात ८३ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू झाली़ यामध्ये २४ कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात आली़ २४ कामे ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली़ उर्वरित कामे लोकसहभागातून केली गेली़ काही गावात ही कामे १ कि़मी़ अंतराची होती़ तर काही ठिकाणी २ कि़मी़ अंतराची होती़ २३ फुट रुंदीचा हा रस्ता करण्यात आला़ दोन्ही बाजूंनी नाली काढून रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला़ त्यानंतर १२ मि़मी़ गिट्टीचा थर व त्यावर १६ मि़मी़ गिट्टीचा थर असे स्वरूप कामाचे होते़ त्यासाठी सरासरी १५ ते १८ लाख रुपये निधीचा अंदाज करण्यात आला़ अनेक ठिकाणी कामे झाली़ परंतु त्याचे मजबुतीकरण शिल्लक राहिले़ गतवर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे या रस्त्याची वाट लागली़ अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे बेहाल झाले़ त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी होवू नये यासाठी या कामाचे मुल्यांकन होवून उर्वरित काम सुरू करणे आवश्यक आहे़ या कामाचे स्वरूप बदलल्यामुळे निधी अडकला असल्याचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पी़बी़ दबणे, सांगितले़ कुशल कामगार ७० टक्के व अकुशल काम ३० टक्के असे झाले होते़या अर्धवट कामामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ अनेक शेतात तळे साचत आहेत़ तर अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे़ काम करणारे गुत्तेदारही त्रस्त आहेत़ शिल्लक राहिलेला निधी मिळाला तरी कामे मार्गी लागतील असे गावकर्यांमध्ये बोलले जात आहे़