Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. १२ जून रोजी झालेल्या या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. विमानातील प्रवासीच नव्हे तर ज्या निवासी भागात हे विमान पडलं तिथसे लोकही मृत्युमुखी पडले. विमानामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने स्फोटाची तीव्रता जास्त होती आणि त्यामुळेच आजूबाजूचा परिसर बेचिराख झाला. आता आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी त्या घटनेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या रेखा यांनी विमान कोसळल्यानंतर भूकंप आल्यासारखे वाटलं असं म्हटलं.
अहमदाबादमध्ये झालेल्या एआय १७१ विमान अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी रेखा क्षत्रिय यांनी या भयानक दुर्घटनेनंतरच्या भयानक क्षणांची आठवण सांगितली. आम्हाला विमानाच्या मोठ्या आवाजाची सवय होती मात्र अपघाताच्या आवाजाने आमच्या कानाचे पडदे फुटतील असं वाटत होते, असे रेखा म्हणाल्या. रेखा यांनी यावेळी पायलटचेही आभार मानले. जर विमान थोडे आधीच कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती असं रेखा यांनी म्हटलं.
"ही घटना घडली तेव्हा आम्ही घरातच नेहमीची कामे करत होतो. त्यावेळी मोठा आवाज आला. विमानांचा आवाज ऐकायची आम्हाला सवय आहे. पण त्यावेळी कानाचे पडदे फाटतील असा आवाज येत होता. त्याच्यासोबत संपूर्ण घर देखील हादरत होतं. भूकंप आल्यासारखे वाटत होतं. त्यानंतर बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर आम्ही लगेच घरातून बाहेर पळत आलो आणि पाहिलं की विमान कोसळलं आहे. स्फोटानंतर उंचच उंच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आग पसरु नये म्हणून सगळे गॅस बंद करुन बाहेर आले. पुढे जाऊन काही लोकांनी पाहिलं तेव्हा कळलं की हे प्रवासी विमान होतं. आम्हाला वाटत होतं की पाकिस्तानातून हल्ला झाला आहे," असं प्रत्यक्षदर्शी रेखा म्हणाल्या.
"आजूबाजूला भीतीचे वातावरण होतं. काही महिला तर विमान पाहून बेशुद्धच पडल्या. त्यांना वाटलं की विमान त्यांच्याच अंगावर पडेल. काहींनी तर ते पाहून रडायला सुरुवात केली. विमानाचे टायर आमच्या छताला स्पर्श करुन झाडाला कापत पुढे गेले. त्यामुळे सर्वजण घाबरले होते. मी पायलटचे आभार मानते, त्याने विमान थोडं पुढे उतरवलं. नाहीतर मृतांची संख्या आणखी वाढली असती," असेही रेखा म्हणाल्या.