महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आयोगाने नकार दिला आहे. असे केल्यास मतदारांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे ठरेल असे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आयोग अशाप्रकारचे फुटेज देणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने केलेली मागणी ही त्यांच्यासाठी ठीक असली, मतदारांच्या हिताची असली किंवा लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी योग्य असली तरी देखील प्रत्यक्षात त्याचा उद्देश अगदी उलट उद्दिष्ट साध्य करण्याचा असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या मागणीला अतिशय तार्किक मागणी म्हणून समोर आणले जात आहे. ती प्रत्यक्षात मतदारांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेच्या चिंतेचे उल्लंघन आहे. हे लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० आणि १९५१ मध्ये घालून दिलेल्या कायदेशीर भूमिकेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. असे फुटेज शेअर केले तर ज्यांनी मतदान केले आहे आणि ज्यांनी मतदान केले नाहीय त्यांच्या गोपनियतेला धोका निर्माण होईल. दोघेही असामाजिक घटकांचे लक्ष्य बनू शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला मतदार ओळखणे सोपे जाईल, अशी भीती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याचबरोबर निवडणूक आयोगाने या निवडणुकांची सर्व सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ ४५ दिवसांत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ज्याच्याकडून उत्तर हवे होते तोच पुरावे नष्ट करत आहे. हे स्पष्ट आहे की सामना फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.