चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या रडारवर असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी आपला तिसरा डोळा उघडून देशातील ३३४ राजकीय पक्षांचे अस्तित्व भस्म केले. महाराष्ट्रासह देशभरातील ३३४ राजकीय पक्षांची मान्यता आयोगाने रद्द केली. यात सर्वाधिक उत्तरप्रदेशातील ११४ आणि दिल्लीतील २७ पक्षांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम २९अ मधील निवडणुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ३३४ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. या कारवाईनंतर देशात आता सहा राष्ट्रीय आणि ६७ प्रादेशिक पक्ष उरले आहेत. एखादा पक्ष सलग ६ वर्षे निवडणूक लढवत नसेल आणि पक्षात काही बदल झाल्यास त्याची माहिती कळविली जात नसेल तर आयोग अशा पक्षांची मान्यता रद्द करू शकतो.
आयोगाने दोन महिन्यांपूर्वी ३४५ पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश राज्यांतील अधिकाऱ्यांना दिले होते. यात असे आढळून आले की, ३४५ पक्षांपैकी ३३४ पक्ष आयोगाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. आयोगाने या पक्षांची मान्यता रद्द केली आहे.
देशातील सहा राष्ट्रीय पक्ष
आम आदमी पक्ष (आप), बहुजन समाज पक्ष (बसपा), भारतीय जनता पक्ष (भाजप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी).
आता फक्त २,५२० पक्ष
देशभरात एकूण २,८५४ नोंदणीकृत परंतु, बिगर मान्यताप्राप्त पक्ष होते. या कारवाईनंतर आता त्यांची संख्या २,५२० झाली आहे.
२००१पासून कारवाई
निवडणूक आयोगाने २००१पासून आतापर्यंत तीन ते चार वेळा अशा पक्षांवर कारवाई केली आहे. कर सवलतीचा गैरवापर हे पक्ष आयकर कायद्याचे आणि मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन करत असल्याचेही आयोगाच्या तपासणीत निदर्शनास आले आहे.
मान्यता रद्द झालेले पक्ष
महाराष्ट्रातील नऊ पक्ष : अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना.
मान्यता रद्द झालेले गोव्यातील पक्ष : गोवा नॅशनलिस्ट पार्टी, गोवा प्रजा पार्टी, युनायटेड गोअन्स पार्टी आणि गोएमकारांचो ओट्रेक अस्रो.
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष : मनसे, मगोप (गोवा), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी), आरपीआय (आठवले), शिवसेना, शिवसेना (उबाठा).