काश्मीरमध्ये संचारबंदीतच ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 03:52 IST2016-09-13T03:52:56+5:302016-09-13T03:52:56+5:30
काश्मीर खोऱ्यात यंदा ईद-उल-अझाचा नेहमीचा आनंद कुठे तरी हरवल्याचे दिसते. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ईदच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसली.

काश्मीरमध्ये संचारबंदीतच ईद
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात यंदा ईद-उल-अझाचा नेहमीचा आनंद कुठे तरी हरवल्याचे दिसते. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ईदच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसली. गेल्या ९ जुलैपासून खोऱ्यात हिंसाचार आणि संचारबंदी असल्यामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. काही रस्त्यांवर (विशेषत: सेंट्रल सिटीचा लाल चौक आणि परिसर) मोजकी खासगी वाहने ये-जा करताना दिसतात. बेकरी, मिठाई आणि तयार कपड्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी नाही. कारण ती बंदच आहेत. मंगळवारी काश्मीर खोऱ्यातील सर्व दहाही जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
रेसिडेन्सी रोडवरील प्रसिद्ध मॉडर्न स्वीट्सच्या मालकाने यंदा ‘ईदला बेकरी उपलब्ध नाही’ असा फलकच लावला आहे. याच दुकानाच्या शेजारचे शक्ती स्वीट्सदेखील बंदच आहे. तथापि, ईदनिमित्त बळी द्यायच्या जनावरांची विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे. ईद उल अझाच्या आदल्या सायंकाळी आम्ही जी विक्री करतो, त्याच्या तुलनेत यंदाची दहा टक्केही नाही व ईद काही तासांवर आली असताना विक्री वाढेल, अशी कोणतीही शक्यता आम्हाला दिसत नाही, असे जनावरे विकणारे अल्ताफ अहमद यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यासाठी फुटीरवाद्यांचा मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा विचार आहे. (वृत्तसंस्था)
जम्मू : सुरक्षा दलाने पूंछ जिल्ह्यात सोमवारी आणखी एका अतिरेक्याला ठार मारले. रविवारपासून सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत चार अतिरेक्यांना मारण्यात यश आले आहे. पूंछच्या मिनी सचिवालयाजवळ गोळीबार सुरू असून, ही मोहीमही अद्याप सुरू आहे.
संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आणखी एका अतिरेक्याला ठार मारण्यात आले आहे. आज सकाळपासून तेथून गोळीबाराचे आवाज येत होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी घराच्या बाहेर पडूच शकले नाहीत.
राजौरी-पूंछ विभागाचे प्रभारी पोलीस महासंचालक जॉन विलियम्स यांनी सांगितले की, एका घरातून आणखी एका अतिरेक्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. याच ठिकाणी रविवारी एक अतिरेकी मारला गेला होता. सुरक्षा दल आणि या चार अतिरेक्यांत रविवारी दिवसभर मिनी सचिवालयाजवळ चकमक सुरू होती.
ग्रेनेड हल्ल्यात एक जण ठार
अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका पोलीस चौकीवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक नागरिक ठार, तर तीन पोलिसांसह नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, अतिरेक्यांनी येथून ५५ कि.मी. दूर शेरबाग भागात पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला. नागरिक बकरी ईदच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडले होते त्याचवेळी हा हल्ला झाला. रस्त्यावर ग्रेनेड फुटले. यात बिलाल अहमदसह दहा जण जखमी झाले. उपचार सुरू असताना बिलाल अहमदचा मृत्यू झाला. जखमींपैकी तीन पोलिसांची प्रकृती गंभीर आहे.