संपादकीय -
By Admin | Updated: June 17, 2014 17:50 IST2014-06-17T00:18:45+5:302014-06-17T17:50:17+5:30
गोव्यात पावसाळा हा कवींसाठी स्फूर्तीदायी ठरत असेल. परंतु सामान्य नागरिकांसाठी मात्र तो अडचणीचा, संकटांचा आणि कधी जीवघेणाही वाटत आला आहे. सोमवारी सलामीलाच पावसाने गोव्याला या आपल्या स्वभावाची प्रचिती आणून दिली. पावसाला जोर नाही आणि मान्सून तर संपूर्ण ताकदीने या भूमीत अजून अवतरायला अवकाश आहे असे वाटत असतानाच पणजी आणि विशेषत: उत्तर गोव्यात तो धुवांधार बरसला व त्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले. जराशा पावसाने झाडे पडणे, पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे हे प्रकार राज्याच्या ग्रामीण भागात सतत अनुभवायला येत असतात. स्थानिक पंचायतींना मान्सूनपूर्व कामे वेळेवर आटोपण्यात अपयश आल्याचा तो परिणाम असतो. सध्या खाणी तरी बंद आहेत. नाहीतर पावसाळ्यात खाणींच्या परिघात राहणार्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. असे एकही वर्ष जात नाही, जेव्हा खाणी कोसळून किंवा

संपादकीय -
गोव्यात पावसाळा हा कवींसाठी स्फूर्तीदायी ठरत असेल. परंतु सामान्य नागरिकांसाठी मात्र तो अडचणीचा, संकटांचा आणि कधी जीवघेणाही वाटत आला आहे. सोमवारी सलामीलाच पावसाने गोव्याला या आपल्या स्वभावाची प्रचिती आणून दिली. पावसाला जोर नाही आणि मान्सून तर संपूर्ण ताकदीने या भूमीत अजून अवतरायला अवकाश आहे असे वाटत असतानाच पणजी आणि विशेषत: उत्तर गोव्यात तो धुवांधार बरसला व त्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले. जराशा पावसाने झाडे पडणे, पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे हे प्रकार राज्याच्या ग्रामीण भागात सतत अनुभवायला येत असतात. स्थानिक पंचायतींना मान्सूनपूर्व कामे वेळेवर आटोपण्यात अपयश आल्याचा तो परिणाम असतो. सध्या खाणी तरी बंद आहेत. नाहीतर पावसाळ्यात खाणींच्या परिघात राहणार्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. असे एकही वर्ष जात नाही, जेव्हा खाणी कोसळून किंवा डंपवरची माती वाहत येऊन ती लोकांच्या घरात शिरली नाही. घरे कोसळणे, लोकांचे संसार उघड्यावर पडणे आणि जीवितहानीही होण्याचे प्रकार तर ग्रामीण भागांसाठी पाचवीलाच पुजले होते. गेली दोन वर्षे अशा लोकांना काही प्रमाणात आश्वस्त जीवन अनुभवास मिळाले आहे. असे असले तरी खाणी लवकर सुरू करा म्हणून परवा डिचोली तालुक्यातील लोक रस्त्यावर आल्याचे एक विपर्यस्त दृश्य पाहायला मिळाले. खाण अवलंबितांची संख्या सरकार पातळीवर वेगळी सांगितली जाते, परंतु अशा मोर्चात मात्र त्यांची बरी उपस्थिती पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी यांच्या गोवा भेटीच्या पूर्वसंध्येला तर वेगवेगळ्या भागांमधून खाण अवलंबितांना अचानक कंठ फुटल्यासारखा झाला. यापूर्वी त्यांच्या संघटनांनी आपापल्या खाणींपासून जीवनाची सुरक्षा मिळावी म्हणून आवाज उठविला आहे, असे घडलेले नाही. आता तर खाणी बंद झाल्याचे निमित्त करून खाण चालकांनी जी थोडीबहुत सामाजिक कार्ये चालविली होती, तीही बंद केली आहेत. वर्षाकाठी ज्या कंपन्यांनी १५ हजार कोटी रुपये नफा कमावला आणि ज्यांनी लोकांना साध्या सुरक्षा व्यवस्थाही निर्माण केल्या नाहीत, त्यांची मानसिकता अशा कठीण वेळीच जनतेसमोर येत असते. त्यामुळे आता खाण अवलंबितांनी खाणी सुरू करा, परंतु त्या जुन्या कंपन्यांना लिजेस मिळू नयेत यासाठी आपला आवाज बुलंद बनविला पाहिजे. जी गोष्ट खाणींनी ग्रामीण भागांची केली, ती बिल्डर्सनी शहरांची केली आहे. सोमवारी अवघा दोन तास पाऊस पडला तर पणजी पाण्याखाली गेली. संपूर्ण बाजारात पाणी तुंबले व गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. बिल्डर्सनी पाणी वाहत जाण्याचे मार्ग अडविले व गटारांवर इमारती उभ्या केल्याचा हा परिणाम आहे. पालिका व लोकनियुक्त सरकारला नियम अत्यंत कठोरपणे राबविण्यात अपयश आले. पणजी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराला राजधानीचा दर्जा आहे. परंतु शहरातील नागरिकांचे जीवन अत्यंत असुरक्षित आहे. त्याची प्रचिती सलामीच्या पावसात आली. गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे, याचा अर्थ रोगराईस आमंत्रण. शिवाय शहरात अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली. पणजीच्या महापौरांचा दावा आहे की, मिरामारचा रस्ता मलनिस्सारणासाठी खोदून ठेवला आहे. त्याचप्रमाणे गटारे साफ करण्यासाठी महानगर पालिकेने तीन वेळा निविदा जाहीर केल्या, परंतु राज्य प्रशासनाने त्यात कोलदांडा घातला! पणजीचे महापौर सतत राज्य सरकारवर आरोप करतात. राज्य सरकारने पणजीची अनेक कामे अडवून धरली आहेत, त्याचप्रमाणे बर्याच कामांसाठी निधीही पुरविला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. पणजी महानगर पालिका ताब्यात घेण्याचा सत्ताधारी पक्षाने अनेक वेळा प्रयत्न केला. यात तथ्य आहे. सत्ताधारी भाजपा महानगर पालिकेला अडचणीत आणण्याची राजकीय खेळी करीत असल्याचे बर्याचवेळा दिसून आले आहे. परंतु दोन्ही गटांमधील या हमरीतुमरीने शहराची कोंडी होऊ लागली आहे आणि नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असेल तर ती खरोखरीच चिंतेची बाब आहे. परंतु सर्वच दोष राज्य सरकारवर ढकलून पालिकेला नामानिराळे राहाता येणार नाही. जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पणजी पालिकेला निधी मिळविता आलेला नाही. याचे कारण कार्यक्षमतेचा अभाव हे आहे. सांतीनेज खाडीपसून कचर्याची विल्हेवाट आणि बेकायदेशीर इमारतींपासून बाजारातील दुरवस्था हे प्रश्न पालिकेला व्यवस्थित हाताळता आलेले नाहीत. बिल्डर्सना वेसण घालण्याचा प्रश्न आणि स्वच्छता हे प्रश्न पालिकेला हाताळण्यास कोण अडथळे आणते? पावसाळ्यापूर्वीची कामे करून घेण्यास अपयश आल्याचे प्रकरण तर अनास्था, निष्काळजीपणा आणि निष्क्रियता या सदरातच मोडते. सलामीच्या पावसातच पणजी शहर पाण्याखाली जाऊन नागरिकांना अडचणी सोसाव्या लागल्याने तर आता पुढच्या दोन महिन्यात नागरिकांपुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज करता येतो. सरकार अिाण पालिका दोघांच्याही अनास्थेचा हा परिणाम असून परिस्थिती खालावत जाऊन या शहरात गंभीर रोगाची साथ पसरू शकते याचा इशारा द्यावासा वाटतो. लक्षात घेतले पाहिजे की पावसाळा सुरू होण्याआधीच गोव्यात डेंग्यू व मलेरियाने तिघांचे बळी घेतले असून हा रोग सहज पसरविण्याइतपत परिस्थिती राज्यातील सार्या शहरांची बनली आहे. आधीच कचर्याची गंभीर बनलेली परिस्थिती आणि गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागण्याचे प्रकार राज्यात गंभीर साथ पसरण्याइतकी गंभीर आणि स्फोटक आहे! वरवर या सर्वाला निमित्त पावसाचे वाटत असली तरी त्यामागची करणी मानवनिर्मितच आहे.