बाळांनो, असे म्हणू नका रे..

By Admin | Updated: May 5, 2014 18:41 IST2014-05-05T18:37:18+5:302014-05-05T18:41:04+5:30

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची कैफियत सांगणारी अशीच एक बातमी आली.

Do not say babies, do not say .. | बाळांनो, असे म्हणू नका रे..

बाळांनो, असे म्हणू नका रे..

le width="100%" border="0">
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची कैफियत सांगणारी अशीच एक बातमी आली. मथळा होता, ‘आमच्या बापाने केलेली चूक तुम्ही करू नका. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची आर्त हाक.’ माझ्या मनात चर्र झाले. शेतकर्‍यांवर अनेकांनी आघात केले, मात्र हा घाव आप्त स्वकियांचा होता. पोटच्या पोरांचा होता. 
एके काळी जेव्हा शेतकर्‍यांना आपल्या दुर्दशेचे भान येऊ लागले होते, तेव्हा त्यांना सांगण्यात आले, ‘हे पाहा, तुझ्या दुर्दशेला इतर कोणीही जबाबदार नाही. हे तुझे प्राक्तन आहे. मागच्या जन्मी जे पाप केलेस ते या जन्मी तुला फेडावे लागत आहेत.’ तूच तुझ्या दुर्दशेला जबाबदार आहेस, हे बिंबवले गेले. तेव्हापासून सारा शेतकरी समाज एका विचित्र न्यूनगंडाने पछाडलेला राहिला. काळ बदलला. भाषा बदलली. परिणाम मात्र तसाच राहिला. अपराधी न्यूनगंड रुजवला गेला. 
देश स्वतंत्र झाला. शेतकर्‍यांची परिस्थिती मात्र बदलली नाही. सरकारी विचारवंत म्हणाले, ‘‘आपला शेतकरी अनाडी आहे. तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. म्हणून गरीब आहे.’’ दोष कोणाचा? शेतकर्‍यांचा! शेतकर्‍यांनी रासायनिक खते वापरली. संकरित बियाणे वापरली. अन्नासाठी वाडगे घेऊन जगभर हिंडणार्‍या देशाला स्वावलंबी बनविले. अन्नाची कोठारे तुडंब भरली. परंतु शेतकर्‍यांची परिस्थिती काही सुधारली नाही. त्या वेळेस दोषाची नवी कारणे पुढे आणली गेली. सरकारी शहाणे म्हणाले, ‘‘शेतकरी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवीत नाही. कुटुंबसंख्या वाढते म्हणून शेतकरी दरिद्री राहतात.’’ कोणी म्हणाले, ‘‘कर्जाचा योग्य ठिकाणी विनिमय करीत नाहीत. लग्नावर अवाच्या सवा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही.’’
परिस्थिती बदलली की सांगायची कारणे बदलतात. मुद्दा एकच. शेतकर्‍यांच्या दुर्दशेला दुसरे कोणी जबाबदार नसून तेच आणि तेच तेवढे जबाबदार आहेत. 
शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ लागल्या. चार दोन असत्या, तर आपण वैयक्तिक बाब म्हणून दुर्लक्ष केले असते. पण आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अफाट झाली. साथीच्या रोगाने माणसे मरावीत तशा आत्महत्या होऊ लागल्या. युद्धात एवढी माणसे मरत नाहीत, तेवढी मरू लागली. वाटले होते की किमान मरणार्‍याला तरी लोक दोष देणार नाहीत. पण ती अपेक्षाही फोल गेली. एक अधिकारी म्हणाला, ‘‘लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी या लालचेने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.’’ त्याला विचारले, ‘‘तुला लालूच दिली तर तू करतोस का?’ चिडीचूप झाला. एक पुढारी म्हणाला, ‘‘दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात.’’ त्याला विचारले, ‘‘ज्या क्षेत्रात दारूड्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा क्षेत्रातील लोक आत्महत्या का करीत नाहीत?’’ बसला गप्प. एक विचारवंत म्हणाले, ‘‘शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे खरे कारण मानसिक आहे.’’ म्हटले, ‘एकाएकीच एकाच क्षेत्रातील लोकांचे मासिक खच्चीकरण का झाले?’ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्यानंतरदेखील शेतकर्‍याला त्याच्या दुर्दशेचे कारण तूच आहेस, असे सांगण्याची प्रवृत्ती गेली नाही. उलट ती वाढली. 
सासुरवाडीत एखाद्या सुनेने जळून आत्महत्या केली, तर वर्तमानपत्रात ती घटना ‘हुंडाबळी’ या शब्दाने संबोधली जाते. शेतकर्‍याने कर्जाच्या जाचापायी जीव दिला, तर त्याला कोणी ‘कर्जबळी’ म्हणत नाही. ती घटना ‘आत्महत्या’ याच शब्दाने संबोधली जाते. कारण या शब्दाचा अर्थ होतो, त्याच्या हत्येला इतर कोणीही नव्हे, त्याचा तोच जबाबदार आहे. दोष शेतकर्‍याच्या पदरात टाकून नामानिराळे होण्याची ही प्रवृत्ती सर्वत्र सारख्या प्रमाणात आहे. 
पुढारी बेलगाम बोलले, अधिकारी बेजबाबदार बोलले, विचावंतांनी लाळ घोळली, पत्रकारांनी दिवे पाजळले. हे सगळे स्वाभाविक आहे. त्याचा प्रतिवाद करता येईल. दोन हात करता येतील. पण जेव्हा त्याच शेतकर्‍यांच्या पोटची पोरं आपल्याच बापाला दोष देताना दिसतात, तेव्हा माणूस हतबुद्ध होऊन जातो. ‘माझ्या बापाने चूक केली..’ हे वाक्य वाचले तेव्हा या लेकरांना सांगावे वाटले, ‘नव्हे रे बाळा, त्याला भाग पाडले गेलेरे.’ जनावरांच्या गळ्यातली दोरी दिसते. माणसाच्या गळ्यातील साखळदंड इतरांना दिसत नाहीत. ते त्यालाच जाणवतात, ज्याचा शेवटी जीव जातो. कापायला नेत असताना जनावरदेखील पाय धरून ठेवतात. तुझ्या बापाने असेच अनेदा पाय रोवले. पण खाटिक बलदंड ठरला. बाळांनो, किमान तुम्ही तरी आपल्या बापाला दोष देऊ नका.
या मुलांचे बोल व्यथित करणारे आहेत. खरोखरीच या मुलांची तशी भावना असेल का? मला वाटतं, त्यांचा बोलाविता धनी कोणी तरी वेगळा असणार. पूर्वजन्माचे पाप म्हणणारा तोच आज नव्या रूपाने या मुलांवर संस्कार करीत आहे. सावधान, बळीराजा, वामन अवतीभोवती वावरतो आहे.
-अमर हबीब

Web Title: Do not say babies, do not say ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.