विजयाने अहंकारी बनू नका
By Admin | Updated: February 11, 2015 03:55 IST2015-02-11T03:55:49+5:302015-02-11T03:55:49+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवून देत ‘चमत्कार’ घडविल्याबद्दल जनतेला अभिवादन करतानाच; या अभूतपूर्व विजयामुळे अहंकारी न बनण्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

विजयाने अहंकारी बनू नका
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीचा माहोल बघून आम आदमी पार्टीतून बाहेर पडत भाजपा आणि काँग्रेसचा हात पकडणाऱ्या दलबदलूंना मतदारांनी चांगलाच इंगा दाखविला आहे. पण इतर पक्षांतून आपमध्ये आलेल्या दलबदलूंना मात्र नशिबानेही साथ दिली. भाजपाच्या पॅराशूट उमेदवार किरण बेदी यांनाही ‘आप’च्या झंझावाताचा फटका बसला. त्याचवेळी काँग्रेस आणि भाजपामधून आपमध्ये आलेल्या उमेदवारांचे नशीब फळफळले. चांदणी चौकातून अलका लांबा, शाहदरामधून रामनिवास गोयल तर गोकलपूरहून फतेहसिंग हे आपमध्ये आलेले उमेदवार विजयी झाले. आपचे माजी विधानसभाध्यक्ष मणिंदरसिंग धीर(जंगपुरा), माजी आमदार विनोदकुमार बिन्नी(पटपडगंज) आणि अशोककुमार चौहान(आंबेकडरनगर) यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश पराभवाकडे घेऊन गेला. काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ (पटेलनगर), माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचे पुत्र अरविंदसिंग (देवली), एस.सी.वत्स (शकूरबस्ती), जेडीयूमधून काँग्रेसमध्ये गेलेले शोएब इक्बाल (मटिया महल) यांनाही पराभवाचा झटका बसला. माजी अपक्ष आमदार रामबीर शौकीन यांच्या पत्नी रिता काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाल्या.