सरहद्दीवर धुमश्चक्री सुरूच

By Admin | Updated: October 9, 2014 05:01 IST2014-10-09T05:01:25+5:302014-10-09T05:01:25+5:30

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू व १५ जण जखमी

Dhumashchri continued on the border | सरहद्दीवर धुमश्चक्री सुरूच

सरहद्दीवर धुमश्चक्री सुरूच

हरीष गुप्ता, जम्मू/नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू व १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीतील ३७ चौक्यांवर तोफा डागल्या. त्यात १५ पाकिस्तानी मारले गेले. पाकिस्तानी तोफा थंडावतील तेव्हाच
चर्चा होऊ शकेल, असा पवित्रा भारताने घेतला आहे.
पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. प्रत्युत्तर कसे आणि किती काळ द्यायचे याचे अधिकार बुधवारी दिल्लीत लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांच्यासमवेत झालेल्या विशेष बैठकांनंतर केंद्र सरकारने लष्कराला दिले आहेत. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांशी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी लष्करप्रमुखांशी चर्चा केली. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्करी महासंचालक) पातळीवर आठ मिनिटे चर्चा झाली, पण परस्परांवर गंभीर आरोप झाल्याने तोडगा निघू शकला नाही. पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमाभागांतील आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने १९२ किमी लांबीच्या सीमेवरील ५० सीमा चौक्या आणि ३५ निवासी वस्त्यांना लक्ष्य करीत तुफान गोळीबार चालवला आहे़

Web Title: Dhumashchri continued on the border