वाराणसीच्या विकासात मोदींना गुगलची साथ
By Admin | Updated: August 7, 2014 13:13 IST2014-08-07T12:42:35+5:302014-08-07T13:13:13+5:30
वाराणसीतून लोकसभेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वाराणसीचा कायापालट करायचा असून याकामात मोदींना गुगलची साथ मिळणार आहे.

वाराणसीच्या विकासात मोदींना गुगलची साथ
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - उत्तरप्रदेशमधील वाराणसीमधून दिमाखदार विजय मिळवून लोकसभेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वाराणसीचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे या कामात मोदींना गुगलचीही साथ मिळणार असल्याचे वृत्त आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांना विकासाची आश्वासन देऊन निवडून येणा-या लोकप्रतिनिधींना निवडणूक संपताच त्या आश्वासनांचा विसर पडतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी याला अपवाद ठरावे असे दिसते. पंतप्रधानपदी विराजमान होऊनही मोदींना वाराणसीचा विसर पडलेला नाही असे मोदींची निकटवर्तीय सांगतात. वाराणसीला देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने मोदी काम करत असल्याचे समजते. टीम मोदीतील सल्लागार आणि अभ्यासक वाराणसी व सभोवतालच्या भागातील कोणत्या गावांमध्ये पर्यटन स्थळ निर्माण करता येईल, निसर्गसौंदर्य लाभलेला भाग, शहराचा विकास आराखडा याविषयावर काम करत आहेत. शहराचा विकासासोबतच सुरक्षा भक्कम करण्यावर मोदींचा भर आहे. या कामात मोदींना गुगलची तज्ज्ञमंडळीही मदत करत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. गुगलने या वृत्तावर नकार दिला असून गुगलचे भारतातील प्रवक्ते म्हणाले, आम्ही सध्या मोदींसोबत कोणत्याही विषयावर काम करत नाही. आम्ही भारताच्या पुरातत्व विभागासोबत काम करत असून देशातील पुरातन पुतळे ऑनलाइन बघता यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पण भविष्यात आम्हाला विकास कामात साथ द्यायला आवडेल असे सूचक विधान त्यांनी केले.
गेल्या महिन्यात फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग यांच्यासोबतही मोदींनी सोशल मिडीयाचा जनजागृतीसाठी वापर कसा करता येईल यासाठी चर्चा केली होती. स्वच्छता आणि प्रशासन या विषयांवर जनजागृतीसाठी मोदींना सोशल नेटवर्किंग साईट्सचा आधार घ्यायचा आहे.
वाराणसीचे पौराणिक स्वरुप कायम ठेवून त्या भागाचा विकास करायचा असे मोदींना वाटते. पर्यटक मदत केंद्र, परदेशी पर्यटकांसाठी आगमन करताच व्हिसा, विमानतळाचे नुतनीरण असे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही वाराणसीत राबवले जातील. अनेक खासगी कंपन्या पर्यटन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे आल्या असून यासाठी त्या मोदींच्या संपर्कात आहेत.