बोगस पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक
By Admin | Updated: June 9, 2015 20:21 IST2015-06-09T11:51:29+5:302015-06-09T20:21:51+5:30
बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

बोगस पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक करण्यात आली असून केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कोणतीच नोटीस न देता तोमर यांना अटक करण्यात आल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी लावला आहे. तोमर यांना हौसखास पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे.
तोमर यांनी सादर केलेले ग्रॅज्युएशन व एलएलबीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भागलपूर युनिव्हर्सिटीतून कायद्याचे शिक्षण घेतल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र तोमर यांचे प्रमाणपत्र बोगस असून त्याचे संस्थेच्या रेकॉर्ड्समध्ये उल्लेख नसल्याचे युनिव्हर्सिटीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. याप्रकरणी तोमर यांची चौकशी सुरू होती, मात्र ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी जितेंद्र सिंग तोमर यांना येथील साकेत कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.
तोमर यांना माफियाप्रमाणे अटक - मनिष सिसोयदियांचा आरोप
दरम्यान कायदामंत्री असलेल्या तोमर यांना एखाद्या माफियाप्रमाणे अटक करण्यात आल्याचे सांगत आणीबाणीसारखी परिस्थिती बनवली जात असल्याचा आरोप 'आप'चे नेते व उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. भ्रष्टाचाराविरोधाती आमची लढाई रोखण्यासाठी तोमर यांना अटक झाली आहे, असे ते म्हणाले. तसचं केंद्र सरकार दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन दिल्ली सरकारवर निशाणा साधत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तोमर यांचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही त्यांना अटक करण्यात आली. घरी घेऊन जातो असे पोलिसांनी तोमर यांना पोलिसांनी सांगितले, मात्र त्यांच्या ड्रायव्हरला अर्ध्या रस्त्यात उतरवण्यात आले आणि पोलिसांनी स्वत: गाडी चालवून ते त्यांना पोलिस स्थानकात घेऊन गेले व अटक केली असे सिसोदिया म्हणाले. दिल्ली पोलिस राजकीय फायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.