Bihar News:बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, श्राद्धाच्या विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली. या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही, तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ही घटना रविलगंजच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे. राम स्वरुप राय यांची पत्नी रमा देवी (४५ वर्षीय) १७ मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, २६ मे रोजी सरयू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमा देवीशी जुळत होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमा देवींचा असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन करुन तो कुटुंबाला सोपवण्यात आला. संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ११ जून रोजी रमा देवीचा श्राद्धविधीही पार पडला.
'मृत महिला जिवंत कशी असू शकते?'कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती. पण, काल(२२ जून) सकाळी अचानक रमा देवी आपल्या घरी परतल्या. त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, "मृत महिला जिवंत कशी असू शकते?"
इतके दिवस महिला कुठे होती?स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा देवी मानसिकदृष्ट्या आजारी असून, कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या. या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्यासारखाच असल्याचे कुटुंबाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले.
तपासाशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेकुटुंबाने सांगितले की, नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते. आता रमा देवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती. दरम्यान, ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला का की, आणखी काही? पोलीस आता या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.