गेल्या काही दिवसापासून महाकुंभ सुरू आहे. महाकुंभमध्ये जगभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. प्रशासनाने स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत, आज वाराणसी स्टेशनवर भाविकांचा मोठी गर्दी झाली होती. वाराणसी स्टेशनवर एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. प्रवाशांनी महाकुंभ स्पेशल ट्रेनचे इंजिन ताब्यात घेतल्याचे आज पाहायला मिळाले. मागील सगळ्याच डब्यात गर्दी झाल्यामुळे प्रवासी इंजिनच्या डब्यात बसले होते.
"त्यांचा नाश निश्चित आहे..."; कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दुर्योधनशी केली
शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास, प्रयागराजला जाणारी महाकुंभ विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वर उभी होती. ट्रेनमध्ये आधीच खूप गर्दी होती, पण प्रवाशांना जागा मिळाली नाही तेव्हा काही जण ट्रेनच्या इंजिनमध्ये चढले. तेव्हा ट्रेनच्या लोको पायलटने त्यांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रवाशांनी दरवाजा उघडण्यासही नकार दिला.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे संरक्षण दलाला पाचारण केले. सैनिकांनी प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी कमी झाली नाही. शेवटी, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि प्रवाशांना एक-एक करून इंजिनमधून खाली उतरवण्यात आले. यावेळी काही प्रवाशांनी विरोधही केला, परंतु सुरक्षा दलांनी कडकपणा दाखवत इंजिन रिकामे केले. यानंतर लोको पायलटने रेल्वे इंजिनचा ताबा घेतला.
महाकुंभाचे तीन शाही स्नान संपले आहेत, पण भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. रेल्वे स्थानकांवर गोंधळ आहे, यामुळे गाड्यांचे कामकाज विस्कळीत होत आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि प्रवास सुरक्षित आणि व्यवस्थित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजसाठी सतत अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत, पण गर्दी जास्त असल्यामुळे परिस्थिती हाताळणे कठीण होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आणि सुरक्षा दल सतत काम करत आहेत.