गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील तरूणाईला ------

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:23+5:302015-07-15T23:12:23+5:30

बाळासाहेब काकडे

Criminal seal of pardhi community in Tarunai | गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील तरूणाईला ------

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील तरूणाईला ------

ळासाहेब काकडे
फोटो
श्रीगोंदा : पारधी म्हटले की गुन्हेगार, दरोडेखोर म्हणून शिक्का बसलेली आदिवासी जमात परंतु श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील काही कुटुंबांनी जीवनात सकल मार्गाने परिवर्तन करण्यासाठी कठोर परिश्रम, संघर्ष करीत शेतीमळे फुलविले आहेत. त्यामुळे अशा कुटुंबात सुख, समृद्धी आणि शिक्षणाचा नंदादीप प्रकाशमान झाला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पारधी जमातीतील ३ हजार ९०० लोकसंख्या आहे. याच तालुक्यात सर्वाधिक दरोडे, ड्रॉपसारखे गंभीर गुन्हे घडले. बहुतेक गुन्ह्यामध्ये पारधी समाजातील गुन्हेगारांना जेलची हवा मिळाली आहे.
गुन्हे करून पोलीस, समाजाचा रोष ओढवून घेणे व जेलमध्ये अंधारमय जीवन जगण्यापेक्षा दर्जेदार शिक्षण आणि शेतीत घाम गाळून जीवनात परिवर्तन करण्यासाठी या समाजातील युवा पिढीने धडपड सुरू केली आहे.
बेलवंडी येथील फुलचंद चव्हाण यांनी टोमॅटो,बरनश्याभोसले यांनी डाळिंबाची बाग तर चंद्रकांत काळे यांनी लिंबोणी तर लोणी व्यंकनाथ येथील विलास काळे यांनी झेंडू तर शरद काळे यांनी डाळिंबाची बाग फुलविली आहे.
विश्रांत काळे (आढळगाव), सखाराम चव्हाण (ढोरजा), संगीता चव्हाण (वडाळी), सुमन चव्हाण (सुरोडी), बक्कट काळे (बेलवंडी कोठार), सुरेखा भोसले (घारगाव) यांनी ऊस, कांदा, गहू, ज्वारी सारखी पिके घेऊन शेतीत बस्तान बसविले आहे. बहुतेक तरूणांनी शेतीत ठिबक सिंचन,मल्चिंग पेपरसारखे नवे तंत्रज्ञान स्वीकारले आहे.
नामदेव काळे, आकाश काळे, दीपक चव्हाण, रतन चव्हाण, निकम भोसले यासारख्या तरूणांनी मेंढीपालन करून उदरनिर्वाहाचा सक्षम मार्ग निवडला आहे.
किरण काळे हे जिल्हा सहकारी बँकेत विसापूर शाखेचे व्यवस्थापक आहेत. लोणीचे संतोष भोसले बी. एस्सी. (ॲग्री), छाया भोसले (सिव्हील इंजिनिअर), गोपीचंद काळे (हॉटेल मॅनेजमेंट), प्रमोद काळे (एम. ए.) झाले असून प्राथमिक शाळा, विद्यालयात पारधी समाजातील विद्यार्थ्यांचा आवाज घुमत आहे.
शेतीत घाम गाळून मिळालेल्या पैशातून घरदार बांधली असून शरद काळे सारख्या शेतकरी मुलांनी चारचाकी गाड्या घेतल्या आहेत. त्यामुळे पारधी जमातीची समाजाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडू लागली आहे.श्रम, शिक्षण, संस्काराच्या माध्यमातून परिवर्तनाचा मार्ग निवडलेल्या तरूणांचा आदर्श घेऊन गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेल्या तरूणांनी बाहेर पडल्यास निश्चितच अंधारमय व सैरभैर जीवनात स्थिरता आल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

पोलिसांचा ससेमिरा संपला
माझा आजोबा गुन्हेगार. परंतु आम्हाला शासनाने जमीन दिली. जीवनात परिवर्तन करण्याचा मार्ग शेतीत सापडला. मुले शिकतात, पोलिसांचा ससेमिरा संपल्याने रात्रीची शांत झोप लागते.
चंद्रकांत काळे, बेलवंडी

लक्ष्मी नांदेल
मला सुरोडीचे सरपंच होण्याची संधी मिळाली. माणसे, समाज समजला. पारधी समाजातील पालकांनी मुलांना शिकविलं पाहिजे. त्यांनी स्वच्छ कपडे, घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तर घरात लक्ष्मी नांदेल.
सुमन चव्हाण, सरपंच, सुरोडी

------
पारधी समाजातील ३०-३५ मुलांचे संगोपन, शिक्षण करण्याचे भाग्य लाभले. या समाजाची प्रगती करण्यासाठी शिक्षण आणि संस्काराचा पाया भक्कम करावा लागणार आहे. त्यासाठी महामानव बाबा आमटे वसतिगृहाच्या माध्यमातून आयुष्य वेचणार.
आनंद झेंडे
मानद सचिव
बाबासाहेब आमटे वसतिगृह, श्रीगोंदा

Web Title: Criminal seal of pardhi community in Tarunai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.