देश-परदेश : सीमा ओलांडल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या विधानाने वाद
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विधान केले.
देश-परदेश : सीमा ओलांडल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या विधानाने वाद
कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विधान केले. ते तमिळ थांती टीव्हीशी बोलत होते. भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकेच्या उत्तरेतील मच्छीमारांची उपजीविका हिसकावल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, जर कोणी आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर मी गोळी घालू शकतो. मग भलेही यात समोरचा मारला जाऊ द्या. कायदा आम्हाला असे करण्याची मुभा देतो. मच्छीमारांच्या मुद्यावर ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, आमच्या सीमारेषा बळकट आहेत. हे आमचे सागरी क्षेत्र आहे. जाफनाच्या मच्छीमारांना तेथे मासेमारी करू दिली पाहिजे. आम्ही त्यांना मासेमारी करण्यापासून रोखले. त्यामुळे ते आता तोडगा काढण्यास तयार झाले. तोडग्याला आक्षेप नाही. सन्मानजनक तोडगा निघायला हवा; मात्र श्रीलंकेच्या उत्तर भागातील मच्छीमारांच्या उपजीविकेच्या किमतीवर अशा प्रकारचा तोडगा मान्य नाही. श्रीलंकन लष्कराने केलेल्या गोळीबारात गेल्या वर्षी ६०० भारतीय मारले गेल्याबाबतच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अलीकडे अशी घटना घडलेली नाही. श्रीलंकेच्या लष्कराने भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करण्याची शेवटची घटना २०११ मध्ये झाली होती. यातील अनेक घटना श्रीलंकेतील यादवीदरम्यान घडल्या होत्या. यातील काही लोक हे शस्त्रांच्या पुरवठ्यात सहभागी होते, असे विक्रमसिंघे म्हणाले. उत्तरेकडील मच्छीमार आजही आम्हाला विचारतात की श्रीलंकन नौदल आमचे रक्षण का करीत नाही. आम्ही आमच्या मच्छीमारांना आमची सागरी सीमा कोणती आहे हे समजावून सांगायला हवे. आम्ही भारताशी चर्चा करून यातून मार्ग काढायला हवा. भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकन हद्दीत मासेमारी करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते आमच्या हद्दीत काय करीत आहेत? त्यांनी त्यांच्या हद्दीत मासेमारी करावी आणि आमच्या मच्छीमारांना आमच्या हद्दीत मासेमारी करू द्यावी, असेही ते म्हणाले. त्यामुळे समस्या उद्भवणार नाही. अन्यथा आमच्या नौदलावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करू नये, असे ते म्हणाले. इटालियन खलाशांचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, जर भारत इटलीचा मित्र आहे तर त्याने इटलीबाबतही तीच उदारता दाखवायला हवी जो ती आमच्याकडून अपेक्षित करतो, असेही विक्रमसिंघे म्हणाले. श्रीलंकेच्या लष्कराने गेल्या महिन्यात ८६ मच्छीमारांना अटक करून त्यांच्या १० नावा जप्त केल्या होत्या.