काँग्रेसला शस्त्रक्रियेची गरज

By Admin | Updated: May 21, 2016 09:29 IST2016-05-21T04:22:00+5:302016-05-21T09:29:32+5:30

चार राज्यांत पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची (सर्र्जरी) गरज असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी घरचा अहेर दिला आहे.

Congress needs surgery | काँग्रेसला शस्त्रक्रियेची गरज

काँग्रेसला शस्त्रक्रियेची गरज


नवी दिल्ली : चार राज्यांत पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची (सर्र्जरी) गरज असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी घरचा अहेर दिला आहे.
काँग्रेसने आसाम, केरळमधील सत्ता गमावली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष यांच्याशी केलेली युती कामी आली नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया नोंदविली. निकाल निराशाजनक असले तरी अनपेक्षित नव्हते. पुरेसे आत्मपरीक्षण केले आहे. आता मोठी सर्जरी का करू नये, असा सवाल त्यांनी केला. गेल्या वेळी पराभवाच्या कारणमीमांसेसाठी आत्मपरीक्षण करतानाच जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने काम करू, असे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)
>राहुल गांधींना बढतीची केवळ चर्चाच!
उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदी बढती देण्यासह काँग्रेसमधील बहुचर्चित संघटनात्मक फेरबदल लवकरच पार पाडले जाण्याची चर्चा सुरू असतानाच दिग्विजयसिंग यांनी मोठ्या फेरबदलाची गरज प्रतिपादित केली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५४३ पैकी केवळ ४४ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला ऐतिहासिक दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही अ.भा. काँग्रेस समितीमध्ये बदल करण्याच्या हालचाली वा चर्चा सुरू झालेल्या नाहीत.
>काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या ‘खिचडी गटां’च्या मागे पडणार?
विधानसभा निवडणुकीतील वाईट कामगिरीवरून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर लक्ष्य साधले. हा पक्ष रसातळाला लागला असल्याची टीका करतानाच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या खिचडी गटांच्याही मागे पडणार काय, असा सवाल केला.
काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित करताना हा अनेक नेत्यांची मिळून एकत्र बांधणी असलेला पक्ष होणार की निवडणुकांमधील अपयशानंतरही घराणेशाही असलेलाच पक्ष राहणार, अशीही विचारणा त्यांनी केली.
केंद्र सरकार जनतेच्या व्यापक कल्याणासाठी पाचही राज्यांमधील निर्वाचित राज्य सरकारांना सोबत घेऊन काम करेल, अशी ग्वाही जेटली यांनी फेसबुकवरील आपल्या वक्तव्यात दिली.


आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीतील विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुरूप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जेटली म्हणाले की, २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर काँग्रेसची वेगाने पीछेहाट होत आहे. कारण तिची वागणूक शासन करणाऱ्या स्वाभाविक पक्षाप्रमाणे नव्हती. आज हा पक्ष संकटाच्या खाईत लोटला जात आहे.
केरळमध्ये काँग्रेसचा पराभव झाला; कारण तेथे त्यांचे सरकार भ्रष्टाचार व घोटाळ्यात सामील होते. आसाममध्ये व्होटबँकेसाठी बेकायदेशीर स्थलांतरणाच्या पारंपरिक धोरणामुळे जनतेची नाराजी या पक्षाला भारी पडली. तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेस युतीत प्रचंड सुस्ती होती.

Web Title: Congress needs surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.