काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री भाजपाच्या संपर्कात
By Admin | Updated: May 20, 2014 03:21 IST2014-05-20T03:21:38+5:302014-05-20T03:21:38+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आधी मी राष्ट्रवादीचे दोन आमदार फोडणार, असे सांगितले होते आणि तसेच झाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री भाजपाच्या संपर्कात
यदु जोशी/गजानन जानभोर, नवी दिल्ली - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री, आमदार भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी मी राष्ट्रवादीचे दोन आमदार फोडणार, असे सांगितले होते आणि तसेच झाले. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री आमच्याकडे येतील़ काहींशी तर आपली चर्चा सुरू आहे, असे मुंडे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा आणि राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी, अशी मागणी मुंडे यांनी या मुलाखतीत केली. प्रश्न - बीडच्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया काय? आपण जिंकलात, पण आपले मित्र आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा दारुण पराभव झाला; असे का झाले? मुंडे - पवार मला संपवायला निघाले होते. मी त्यांना पुरून उरलो, एवढाच त्याचा अर्थ आहे. बीडची जनता (पान १ वरून ) माझ्यासोबत आहे हे सिद्ध झाले. भुजबळ यांच्यावर निवडणूक लादण्यात आली होती. त्यांची लढण्याची इच्छा नव्हती; पण राज्यात अजित पवार यांच्या मार्गात अडथळा नको म्हणून त्यांना लोकसभेला लढविले गेले. भुजबळ, तटकरेंचा बळी दिला गेला; मग अजित पवारांना माढातून का उभे केले नाही? राज्यातील मतदारांनी या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला इतका मोठा कौल का दिला? राज्यात आता काय परिस्थिती असेल? मुंडे - मोदींच्या नेतृत्वावरचा हा विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धचा हा कौल आहे. महागाई, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले. आता राज्यात मध्यावधी निवडणूक घेऊन त्यांनी नव्याने कौल घेतला पाहिजे. आमदारांचे संख्याबळ त्यांच्याकडे कितीही असले तरी त्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आता प्रश्न केले जात आहेत. आपले याबाबत मत काय? मुंडे - राष्ट्रवादीने आता काँग्रेसमध्ये विलीन झालेले बरे. केवळ शरद पवार यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकता येतील, अशी परिस्थिती नाही, परवाच्या निकालाने हे सिद्ध केले आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यावा. राष्ट्रीय राजकारणात पवार यांना आता संधी दिसत नाही. सहकार क्षेत्र आणि सहकारी साखर कारखानदारीमुळे त्यांच्याभोवती असलेले मोहोळ आता राहील, असे वाटत नाही.