विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेसने दंड थोपटले
By Admin | Updated: June 10, 2014 00:38 IST2014-06-10T00:38:08+5:302014-06-10T00:38:08+5:30
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरू झाली आहे. सरकार काँग्रेसला कोणतेही महत्त्वपूर्ण पद द्यायला तयार नाही.

विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेसने दंड थोपटले
>डावलण्याचा डाव : अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेसला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरू झाली आहे. सरकार काँग्रेसला कोणतेही महत्त्वपूर्ण पद द्यायला तयार नाही. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासह, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदांवर दावा सांगितला आहे.
अण्णाद्रमुक आणि तृणमूल काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपद, तसेच लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देत काँग्रेसला अडगळीत टाकण्याचा डाव भाजपाने आखला आहे.
संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या मागणीवरून टर उडविली. देशातील जनतेने काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदासाठीही निवड केलेली नाही, मग विरोधी पक्षनेतेपद कसे देणार, असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे काँग्रेसने या मुद्यावर आक्रमक धोरण अवलंबण्याची तयारी केली आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावत संसदेतील डावपेचांवर चर्चा केली.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देण्याचे काम आनंद शर्मा करणार असून, लोकसभेतील नावासाठी शोध सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने काँग्रेसने राज्यसभेत जोरदार हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाविरोधात एकजूट
भाजपाला जोरदार विरोध करण्यासाठी समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि अन्य छोटय़ा पक्षांसोबत समन्वय राखत सरकारवर अंकुश आणण्यासाठी काँग्रेसने डावपेच आखले आहेत. मंगळवार आणि बुधवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्यावेळी या विरोधकांची एकजूट दिसून येईल, असे संकेत मिळाले आहेत.
जनतेने या पदासाठी कोणालाही निवडले नाही- नायडू
-लोकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाची निवड केलेली नाही. परंतु हा विषय अद्याप बंद झालेला नाही, असे नायडू म्हणाले.
-काँग्रेसमध्ये जनादेशाची भावना समजून घेण्याची क्षमताच नाही. जर एखाद्या पक्षाला 55 जागा मिळालेल्या असतील तर या मुद्यावर कोणतीही चर्चा व्हायला नको.
-विरोधी पक्षनेत्याची निवड हा लोकसभा अध्यक्षांचा विशेषाधिकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
केवळ काँग्रेसचे नाही; संपुआचे संख्याबळ लक्षात घ्यावे
-काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी म्हणून निवडणूक लढविली असल्याने, केवळ काँग्रेसचे संख्याबळ न मोजता संपुआचे संख्याबळ लक्षात घेतले जावे. तृणमूल काँग्रेस, बीजद, अण्णाद्रमुक यांनी निवडणुकीनंतर आघाडी स्थापन केली आहे, याकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी लक्ष वेधले. लोकसभेत काँग्रेसचे केवळ 44 खासदार असल्यामुळे या पक्षाला दडपता येईल, असे भाजपाला वाटते; मात्र आमची दोन हात करण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.