भय काँग्रेसचे संपत नाही..

By Admin | Updated: May 6, 2014 13:44 IST2014-05-06T13:40:01+5:302014-05-06T13:44:14+5:30

भारतातील निवडणुका क्वचितच सहजपणे होतात. इथल्या निवडणुका युद्धासारख्या खेळल्या जातात. निवडणुका म्हणजे रणधुमाळीच असते.

The Congress does not end with fear. | भय काँग्रेसचे संपत नाही..

भय काँग्रेसचे संपत नाही..

 
भारतातील निवडणुका क्वचितच सहजपणे होतात. इथल्या निवडणुका युद्धासारख्या खेळल्या जातात. निवडणुका म्हणजे रणधुमाळीच असते. १९७७च्या निवडणुकीतला किस्सा आहे. 
विरोधी पक्षाचा प्रचाराचा जंगी मेळावा होता त्या दिवशी सरकारी ताब्यातल्या टीव्हीवर अचानक ‘शोले’ हा सुपरहिट चित्रपट दाखवायला 
सांगण्यात आले. ‘शोले’ पाहण्यासाठी लोक घरीच थांबतील, विरोधकांच्या सभेला गर्दी होणार नाही, 
हा त्यामागचा डाव होता. आणीबाणीच्या राजवटीतून आलेले ते एक प्रकारचे नैराश्य होते. आणीबाणीत हजारो लोकांना खटल्याशिवाय तुरुंगात डांबण्यात आले. घटनेने दिलेले मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आमनेसामने उभे ठाकले. एकमेकांना सवाल करू लागले. 
जुलमी राजवटीचे वागणे समजू शकते; पण संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे वागणे अगम्य होते. संपुआ सरकार जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करू शकले नाही, हे उघड होते. राज्यकारभाराचा प्रश्न असो किंवा आर्थिक वा सामाजिक समतोल राखण्याची बाब असो किंवा विश्‍वासार्हतेचा प्रश्न असो, सरकार कमी पडले. पण, मनमोहनसिंग सरकार कोलमडले नव्हते. सरकार नावाची वस्तू उरली नाही, असा आरोप सरकारवर झाला नाही. 
१९९१ आठवा. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारची काय अवस्था होती! १९७५ ते ७७ या दोन वर्षांत काय धुमाकूळ होता. गेल्या पाच वर्षांत तशी परिस्थिती नव्हती. तरीही सत्ता पक्षाला निवडणूक हरण्याची भीती वाटते. 
आपली सत्ता जाईल, या भयाने सत्ता पक्ष हादरलेला दिसतो. एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्ता आघाडीचा तोल जाताना दिसतो. हे अंधारात काठी आपटणे झाले. सरकारची धडपड पाहिली तर ते स्पष्ट जाणवते. १६ मे रोजी मतमोजणी आहे. देशाच्या इतिहासात सर्वांत लांब काळ चाललेल्या निवडणुकीचा निकाल या दिवशी लागेल. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या शक्यतेने सत्ता पक्ष अस्वस्थ झालेला दिसतो. काँग्रेसवाले एवढे हादरले आहेत, की निवडणुकीची हवा पलटवण्याच्या भानगडीत न पडता कसेही करून मोदींना रोखायचे, हा सध्या त्यांचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. काहीही करून मोदींना अडवा.
काँग्रेस पक्षात कशी घबराट पसरली आहे, याचे दर्शन पदोपदी घडते. मोदींना अडवण्यासाठी मुस्लिमांनी एक होऊन मतदान करावे, या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनातून हीच भीती झळकते. 
मोदी सत्तेत आले, तर तुमच्या नुकसानीचे ठरू शकते, असे त्या म्हणाल्या तेव्हा ही भीती अधिक स्पष्ट होते. गेली निवडणूक आठवा. २00९च्या निवडणुकीत भाजपाने त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना पुढे केले होते. त्या निवडणुकीतला भाजपाचा प्रचार कसा सुरू होता आणि सध्याचा प्रचार कसा सुरू आहे ते पाहा. चहा पार्टी चालावी तशी संथ मोहीम त्या वेळी चालली. कुठलेही अडथळे नव्हते. 
आज २0१४ ची कथा एकदम वेगळी आहे. सप्टेंबर २0१३मध्ये मोदींचा भाजपाने राज्याभिषेक केला आणि त्यांना फटाके लागणे सुरू झाले. मोदींचे 
लग्न झालेले नाही, असेच देश मानत होता. विरोधकांनी मोदींची पत्नी शोधून काढली. ४५ वर्षांपूर्वी मोदी तिच्यापासून वेगळे राहत होते. मोदींची लग्नाची बायको असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले; पण त्यांची पत्नी मीडियापासून चार हात दूरच राहिली. 
डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसचा धुव्वा उडाला. याच वेळी मोदींनी एका महिलेवर पाळत ठेवायला आपल्या पोलिसांना सांगितल्याची बातमी आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने चौकशी करायचा निर्णय केला. घाईचा मामला होता. आचारसंहिता लागायच्या आधी न्यायमूर्तीला शोधणे जरुरी होते; पण कायदामंत्र्याला न्यायमूर्ती मिळाला नाही. आता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात, की मतमोजणी सुरू व्हायच्या दिवसाच्या आधी न्यायमूर्ती नेमला जाईल. हे सारे हास्यास्पद आहे. मी म्हणतो, घाई कशाची? मित्रपक्षांना तर आधी विचारा. घाई आहे, कारण मोदीविरोधकांचे नीतिधैर्य उंचवायचे आहे. कसेही करून मोदींना रोखण्याच्या नादात काँग्रेसश्रेष्ठींनी नव्याने व्यूहरचना केली आहे. मोदींना चीत करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि जयललिता यांचे सहकार्य घेतले जात आहे. 
काँग्रेस आणि भाजपा यांचा परस्परविरोध जगजाहीर आहे; पण संसदेच्या समित्यांच्या बैठकांमध्ये हे दोघे एकत्र बसतात, निर्णय घेतात. गेली कित्येक दशके काँग्रेसवाले वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज यासारख्या भाजपा नेत्यांना जवळून पाहत आले आहेत. ओळखून आहेत. हे लोक सत्तेवर आले, तरी आपल्या प्रतिष्ठेत फरक पडणार नाही, याची काँग्रेसश्रेष्ठींना कल्पना आहे. वाजपेयी तब्बल ६ वर्षे एनडीएचे पंतप्रधान होते. राजीव गांधी यांच्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी वेगाने व्हावी, यासाठी वाजपेयींनी कधीही उत्साह दाखविला नाही. 
अडवाणीही तसेच वागले. सुषमा स्वराज तर ‘वीरभूमी’वर राजीव गांधींच्या प्रार्थना सभेला जाऊन आल्या; पण मोदी हे भाजपाच्या इतर नेत्यांसारखे नाहीत. मोदी ही काय चीज आहे, हे अजून कळालेले नाही. गांधी घराणे मोदींना गृहीत धरून चालू शकत नाही. 
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी एक लाख रुपयाचे ३00 कोटी रुपये बनवले ती भानगड मोदींनी काढली, तेव्हा काँग्रेसमधून नव्या जोराने मोदींचे पाळत प्रकरण लावून धरायला सुरुवात झाली. हा गुज्जूभाई तडजोड करणार्‍यांपैकी नाही याची काँग्रेसश्रेष्ठींना माहिती आहे. सारी घबराट आहे ती या कारणाने. दिल्लीत सध्या सत्तेत बसलेले ‘मोदी ज्वरा’ने फणफणले आहेत. हा माणूस मोरारजी देसाईंसारखा नाही, याची त्यांना छान कल्पना आहे. आणीबाणीतील गैरकारभाराविषयी चौकशी आयोग नेमून मोरारजीभाई मोकळे झाले.
करायचे झाले, तर आता मोदी तसे करणार नाहीत. चौकशी लावून अहवाल काढून त्याची अंमलबाजवणी होईपर्यंत ते पिच्छा पुरवतील. 
संपुआ सरकारमध्ये अनेकांनी कुठलीही जबाबदारी 
न घेता सत्ता भोगली. आताचे ‘मोदी रोको’ सुरू 
आहे ते त्यासाठी. प्रादेशिक नेतेही भयग्रस्त आहेत. भाजपा २00 जागांच्या आत थांबला, तर प्रादेशिक नेतेही मोदीविरोधी छावणीत दाखल झालेले दिसतील.
( हरीश गुप्ता - लेखक लोकमत वृत्तपत्र समूहाचे नॅशनल एडिटर आहेत.) 

 

Web Title: The Congress does not end with fear.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.