देशाचा चौकीदार चोरच आहे, आम्ही सिद्ध करून दाखवूः राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 07:04 PM2018-12-14T19:04:33+5:302018-12-14T19:11:36+5:30

राफेल विमान घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू की देशाचा चौकीदारच चोर आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला.

Congress chief Rahul Gandhi on Friday hit back at the BJP for attacking it over the Rafale issue | देशाचा चौकीदार चोरच आहे, आम्ही सिद्ध करून दाखवूः राहुल गांधींचा हल्लाबोल

देशाचा चौकीदार चोरच आहे, आम्ही सिद्ध करून दाखवूः राहुल गांधींचा हल्लाबोल

Next

नवी दिल्ली : राफेल विमान घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू की देशाचा चौकीदारच चोर आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला.

सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दिलासा दिला आहे. राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत, असा निर्णय देत याविरोधात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राफेल किंमतीवर अद्याप प्रश्न कायम आहे. यामध्ये घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू की देशाचा चौकीदारच चोर आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 




526 कोटींचे राफेल विमान 1600 कोटीला विकत का घेतले?, कॅगचा अहवाल संसदीय समितीसमोर का येत नाही? एचएएलकडून कंत्राट का काढून घेतले?  हे कंत्राट अनिल अंबानींना का दिले? असे विविध प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

याचबरोबर, देशाला माहीत आहे की चौकीदारच चोर आहे. आम्ही सिद्ध करुन दाखवू की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी चोरी केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ज्यावेळी राफेल प्रकरणाची चौकशी होईल आणि ही चौकशी संसदीय समिती करेल, त्यावेळी दोन नावे समोर येती. ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी असेही राहुल गांधी म्हणाले. 


दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दिलासा दिला आहे. राफेल कराराच्या विरोधात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत. सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. सरकार खरेदी करत असलेल्या 126 विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. या प्रकरणातील प्रत्येक बारकाव्याची पडताळणी करणे सर्वोच्च न्यायालयाला शक्य नाही, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे.


काय आहेत काँग्रेसचे आरोप?
राफेल विमानांच्या खरेदीसाठी यूपीए सरकारनं जो करार केला होता, त्यापेक्षा तिप्पट रक्कम मोजून मोदी सरकारनं करार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. यूपीए सरकारनं एकूण 126 विमानांसाठी हा करार केला होता. यातील फक्त 18 विमानं फ्रान्समध्ये तयार करुन ती भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात येणार होती. उर्वरित विमानांची निर्मिती डसॉल्ट कंपनी (राफेल निर्मिती करणारी कंपनी) भारतात हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेडच्या मदतीनं करणार होती. मात्र मोदी सरकारनं हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीला डावलून अनिल अंबानींच्या रिलायन्सला कंत्राट दिलं. विशेष म्हणजे हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेडकडे संरक्षण क्षेत्रात काम करण्याचा 78 वर्षांचा अनुभव आहे. तर रिलायन्सकडे असा कोणताही अनुभव नाही. काँग्रेसनं याच मुद्यांवर आतापर्यंत देशभरात 100 हून अधिक पत्रकार परिषदा घेत मोदी सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. 

राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शाह
सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावरून मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सत्याचा विजय झाला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठीच राफेलवरून राजकारण केल्याचा आरोपही भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. असत्य निराधार असते. त्यामुळेच नेहमी सत्याचा विजय होतो. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राहुल गांधींनी आता तरी बालिशपणा सोडावा, असेही ते म्हणाले आहेत.  

Web Title: Congress chief Rahul Gandhi on Friday hit back at the BJP for attacking it over the Rafale issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.